आळंदी -करोनाच्या साथीचे भय लक्षात घेऊन श्रीक्षेत्र अलंकापुरीत होणारी कार्तिकी वारी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडावा, अशी स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी घेतली. तसे निवेदन त्यांनी संस्थान समितीला दिले आहे.
यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींचा 725 वा संजीवन समाधी सोहळा आहे. त्यामुळे या सोहोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल येण्याची शक्यता व्यक्त होत असताना करोनाच्या संकटामुळे ही वारी आणि सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडावा, असे आळंदीकर ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (8 डिसेंबर) पासून भरणार आहे. कार्तिकी एकादशी (11 डिसेंबरला) तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिकी वद्य त्रयोदशी (13 डिसेंबरला) आहे. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर असा हा आळंदीचा कार्तिकी वारी सोहळा असणार आहे.
वारीला येणाऱ्या वारकऱ्यांमुळे आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांद्वारा राज्यातील इतर गावातही कोरोनाचा प्रसार होऊ नये यामुळे यंदाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थिती व्हावा, असे शंकरराव कुऱ्हाडे पा. (भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष), नंदकुमार वडगावकर, गणपतराव कुऱ्हाडे (माऊलींचे मानकरी), संदीप नाईकरे, माऊली दिघे, शिवाजी सुर्वे, सुदीप गरूड, रमेश कारले, ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी मांडले. संस्थान समितीने गावकऱ्यांच्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.