आळंदी (महादेव पाखरे/ ज्ञानेश्वर फड) – ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर हाच ध्यास… हाच श्वास असणाऱ्या भागवत धर्मियांच्या अतुट श्रध्देपुढे आज इंद्रायणीही नतमस्तक झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याला आलेल्या वारकरी बांधवांच्या भक्तीने अवघी अलंकापुरी ही भक्तीसागरात न्हाऊन निघाली. अखंड हरिनामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या नादाने वातावरण अवघे माऊलीमय झाले होते.
करोना साथीमुळे कार्तिकी यात्रा भरली नाही, तसेच हे वर्ष माऊलींच्या समाधीचे 725वे वर्ष असल्याने एकादशी दिवशी तीन लाखाहून अधिक भाविक अलंकापुरीत दाखल झाले होते. मध्यरात्री स्वकाम स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर 12 ते 2 वाजताच्या सुमारास वेदमुर्ती प्रसाद जोशी यांसह 11 बह्मवृंदाच्या वेदघोषात माऊलींना पवमान अभिषेक, महापूजा झाली.
मुख्य गाभारा आणि देऊळवाड्यात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, यात्रा सभापती सचिन गिलबिले, माजी नगरसेवक डि.डि.भोसले पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरू, अनिल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक उपस्थित होते.
व्याजाने पैसे घेऊन वारी
दर्शनबारीतील प्रथम जोडी शेषेराव सोपान आडे (62) गंगुबाई शेषेराव आडे (60, परतवाडी तांडा, ता. परतूर, जिल्हा जालना.) यांना वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महापूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य अत्यंत गरीब कुटुंब असून त्यांनी व्याजाने पैसे घेऊन आपली आळंदीची कार्तिक वारी पूर्ण केली. माऊली संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला.