नवी दिल्ली : करोना विषाणुंच्या प्रसारामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेला कर्तारपुर कॉरिडॉर रविवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पाकिस्तानच्या आंतराष्ट्रीय सीमेतून भारतीय हद्दीत होणारी प्रवासी येजाही बंद ठेवण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कर्तापुर कॉरिडॉर पुन्हा कधी पासून सुरू होणार याची तारीख नंतर जाहींर केली जाणार आहे. या उपाययोजनांच्या संबंधात गुरूदासपुर सीमेवर बीएसएफच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावण्यात आली असून त्यात पाकिस्तानला या नवीन उपायांसंबंधात माहिती दिली जाणार आहे.
भारत-बांगला, भारत-नेपाळ, भारत-भूतान, भारत-म्यानमार या सीमांवरून होणारी प्रवासी येजाही काहीं प्रमाणात रोखण्यात आली आहे. या देशांबरोबरच्या सीमारेषेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे.
देशाच्या 37 सीमारेषांपैकी 18 मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यांवरुन येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल.
करोनाच्या चाचण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या नाक्यांवरुनच प्रवाश्यांना जा-ये करता येईल. मात्र भूतान आणि बांगलादेशमधल्या नागरिकांची व्हिसामुक्त जा-ये पूर्वीप्रमाणेच चालू राहील.