कोयनानगर – कर्नाटकमध्ये जनतेने दिलेला कौल व त्यांच्या मतांचा आम्ही आदर करतो. परंतु, एखाद्या राज्याच्या निकालावरून आपण महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधू शकत नाही. भाजपला 2019 पूर्वी झालेल्या विधानसभेसह व लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही विजय मिळाला नव्हता. परंतु, त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपला एकहाती सत्ता मिळाली. त्यामुळे कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. येत्या 2024 च्या निवडणुकीत राज्यात शिवसेना- भाजप युतीचेच सरकार सत्तेत येणार असून काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दौलतनगर (मरळी, ता. पाटण) येथे शनिवारी “शासन आपल्या दारी’ योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय तंत्रनिकेतन मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, आ. शिवेंद्रराजे भोसले,आ. शहाजीबापू पाटील, आ. महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. फोडाफोडीचे राजकारण लोकांना मान्य नाही, या खा. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “”देशात राहुल गांधींची भारत जोडो का तोडो यात्रा सुरू असतानाही मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंडमधील निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही.
त्या- त्या राज्यातील काही स्थानिक प्रश्न असतात. त्यामुळे कर्नाटकच्या निकालाचा संपूर्ण देशावर परिणाम होईल, असे अनुमान कोणी काढू नये. ते स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे होईल.” कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रावर तर अजिबात परिणाम होणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “”अडीच वर्षात घरात बसून कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिले आहे. आमच्या दहा महिन्यांच्या सरकारचे काम जोमात सुरू आहे. हा फरक जनतेला कळतो. राज्यातील जनतेला काम करणारे सरकार पाहिजे आहे.”
दोन आठवड्यानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांची बैठक
पुनर्वसनासह विविध प्रश्नांवर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत त्यांना वेळही देण्यात आली होती. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे ती बैठक होऊ शकली नाही. मात्र, येत्या दोन आठवड्यांत मुंबई येथे कोयना प्रकल्पग्रस्तांची बैठक घेणार असून यावेळी कोयनेचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, याबाबत दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आपलं घर जळतयं ते बघा…
कर्नाटकचा विजय मोदी आणि शहांच्या हुकूमशाहीचा पराभव असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “”कोणाचा पराभव झाला आणि कोणाचा विजय झाला, हे सर्वांना माहिती आहे. “आपलं घर जळतय’ते विझवायचे सोडून दुसऱ्याचे घर जळताना पाहून असुरी आनंद घेणारे काही लोक आहेत. त्यामुळे “बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था असून त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.