कोल्हापूर – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी गुरूवारी केले होते. या वक्तव्याचा धैर्यशील माने यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
धैर्यशील माने यांनी म्हंटले कि, गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ, असा दमच त्यांनी भीमाशंकर पाटील यांना दिला.
आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते भीमाशंकर पाटील
मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घालून विषय संपवा.