कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांनी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केल्याने या वर्षाच्या अखेरीस आणखीन एक आत्महत्या चर्चेचा विषय ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडचा स्टार सुशांत सिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर दोन-तीन महिने ही आत्महत्या चर्चेचा विषय ठरली होती, पण एका राजकारण्याच्या आत्महत्येला तेवढेच महत्त्व दिले जाईल की नाही याबाबत मात्र शंका घेण्यास जागा आहे.
कारण सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी दिवसभर दुसरा कोणताही विषय हाताळला नव्हता. नंतरच्या महिन्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्येही सुशांत सिंग, रिया, कंगना राणावत हेच विषय या आत्महत्येच्या निमित्ताने समोर येत होते, पण एका राज्यातील विधान परिषदेचा उपसभापती आत्महत्या करतो या विषयाचे गांभीर्य अनेकांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली, त्याचे कारण अद्यापही शोधण्यात येत असले तरी धर्मेगौडा यांच्या आत्महत्येमागे मात्र विधान परिषदेतील गोंधळ हेच कारण असल्याने या विषयाचे गांभीर्य वाढत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी जोरदार गोंधळ करून धर्मेगौडा यांना जबरदस्तीने त्यांच्या आसनावरून उठवले होते. त्यांना काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली होती, तेव्हापासूनच धर्मेगौडा खूपच अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून त्यांनी आपले जीवन संपवले आहे, हीच गोष्ट समोर येत आहे. धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी जी आत्महत्येची चिठ्ठी सापडली आहे, त्यामध्येही त्यांनी स्पष्टपणे विधान परिषदेत झालेल्या गोंधळाचा उल्लेख केला आहे, ही गोष्ट येथे नाकारून चालणार नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या देशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो, त्या भारतातच लोकशाहीचा प्रमुख खांब असलेल्या विधिमंडळातील गोंधळामुळे एखाद्या राजकीय नेत्याला आपले जीवन संपवावे असे वाटते, ही गोष्ट निश्चितच मनाला चटका लावणारी आहे.
अर्थात, संसदेतील किंवा विधिमंडळातील गोंधळ जरी भारतीय राजकारणाला नवीन नसला तरी या गोंधळाने अशा प्रकारचा बळी हा प्रथमच घेतला आहे, हे मान्यच करावे लागेल. संसदेची सभागृहे असोत किंवा विधिमंडळाची सभागृहे असोत ही सभागृहे चालवण्याची जबाबदारी असणारे अध्यक्ष किंवा सभापती जर संवेदनशील मनाचे असतील तर त्यांना सभागृहात चालणारा गोंधळ पटत नाही, हे यापूर्वीही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. शंकर दयाळ शर्मा उपराष्ट्रपती असताना जेव्हा राज्यसभेचे सभापती होते तेव्हाही सभागृहात झालेल्या गोंधळावर नियंत्रण ठेवता न आल्याने त्यांना भर सभागृहात रडू कोसळले होते. ही आठवणही या ठिकाणी झाल्याशिवाय राहात नाही. पी. ए. संगमा किंवा बालयोगी यांच्यासारखे संवेदनशील राजकारणी आणि सभापतीही सभागृहातील गोंधळामुळे अस्वस्थ झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
सभागृह चालवण्याची जबाबदारी असणारा सभापती किंवा अध्यक्ष जरी राजकारणी नेता असला तरी हे काम करत असताना त्याला कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेता येत नाही, हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. सभापती किंवा अध्यक्ष संपूर्णपणे निष्पक्ष आहे असे मानले जाते; पण त्याच प्रकारची भावना सभागृहात बसणाऱ्या इतर सदस्यांच्या मनात नसेल तर अशा प्रकारचा गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. सभागृहातील इतर सदस्य मात्र सभापती किंवा अध्यक्ष यांच्यावर एखाद्या राजकीय पक्षाचा शिक्का मारून त्यांच्याकडे पाहात असल्यानेच गोंधळाच्या आणि धक्काबुक्कीच्या घटना घडत राहतात. धर्मेगौडा हे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विधान परिषद सदस्य होते आणि विधान परिषदेत गोंधळ घडण्यामध्ये कॉंग्रेसच्या सदस्यांचा पुढाकार होता.
कर्नाटकात सध्या धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये मैत्रीचे वातावरण नाही, हे जगजाहीर असल्यानेच त्याच भावनेतून सभागृहात हा गोंधळ घालण्यात आला. या गोंधळाची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप पाहिली तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अक्षरश: धक्काबुक्की करून आणि बळाचा वापर करून धर्मेगौडा यांना आपल्या आसनावरून बाजूला केल्याचे स्पष्टपणे दिसते. संवेदनशील मनाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारच्या घटनेचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एक तर आपण सभागृहाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याची भावना आणि दुसरीकडे सभागृहात सदस्यांनी टोकाला जाऊन केलेला अपमान, असा दुहेरी धक्का
धर्मेगौडा यांना बसला असावा. या गोंधळानंतर जवळपास दहा-बारा दिवसांनी त्यांनी आत्महत्या केली असली तरी सभागृहातील हा गोंधळ हेच कारण असल्याचे त्यांनी स्पष्टपणे आपल्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. त्यावरून गेल्या दहा-बारा दिवसांतील त्यांची मानसिक स्थिती लक्षात आल्याशिवाय राहात नाही. कर्नाटकातील आणि देशातील सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी धर्मेगौडा यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केले असले तरी या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष सभागृहात कसे वागायचे याबाबत स्वतःवर काही बंधने घालून घेतील का, हा प्रश्न या निमित्ताने सर्वांना विचारावा लागणार आहे. सरकारी पक्षाला काम न करू देणे ही जर विरोधी पक्षांची सभागृह चालवण्याची रणनीती असेल तर अशा प्रकारच्या घटना नजिकच्या काळामध्ये घडणे केवळ अपरिहार्य आहे.
नियंत्रित प्रमाणात गोंधळ, घोषणाबाजी आणि सभात्याग ही आतापर्यंत सर्वमान्य असलेली आयुधे वापरून सरकारला अडचणीत आणणे, योग्य असले तरी या आयुधांचा टोकाला जाऊन वापर करणे चुकीचे ठरू शकते हे धर्मेगौडा यांच्या आत्महत्येवरून सिद्ध झाले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या काळात झाली तेवढीच तीव्र चर्चा या निमित्ताने माध्यमांमध्ये घडून येईल आणि राजकीय पक्षही गांभीर्याने या विषयाची दखल घेतील आणि आगामी कालावधीमध्ये संसद असो अथवा विधिमंडळ, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष योग्य मार्गाने हे सभागृह चालवण्याची काळजी घेतील अशी आशा यानिमित्ताने करावयास हवी. धर्मेगौडा यांच्यासारख्या एका उपसभापतीचा बळी गेल्यानंतर तरी भारतीय राजकारण्यांनी आता जागे होण्याची गरज आहे.