नवी दिल्ली : देशात पावसाने अनेक भागात थैमान घातला आहे. त्यातच कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसासह पुराचे तांडव सुरू असल्याचे दिसत आहे. कर्नाटक आणि केरळ राज्यात पुरामुळे आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे तर अजनूही 36 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, कर्नाटकच्या 22 जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर केवळमध्ये अनेक जिल्हे पुरपरिस्थितीने बेहाल झाले आहेत.
केरळमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान होत आहे. केरळमध्ये आतापर्यंत 104 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 2 लाख 87 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी राज्यात 1653 निवारा केंद्र सुरु केले असून त्यातच या सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर तिकडे कर्नाटकमध्येही तिच परिस्थिती आहे. राज्यात आतापर्यंत 62 लोकांना पुरामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील पुरपरिस्थिती पाहता राज्य सरकारने केंद्राकडे 3 हजार कोटींची मागणी केली आहे. दरम्यान, राज्यात 14 हजारपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले असून 1 लाख 57 हजार 498 नागरिकांना 624 निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार सर्वच वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असून त्यांच्या घराची डागडुजीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.