बंगळुरू – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुतीदिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली होती. यावेळी दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया’ असं म्हंटलं होत.
पवार यांच्या याच वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा पद्धतीने वाद निर्माण करणे दुर्दैवी असल्याचं म्हंटलंय. “मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. महाजन आयोगाचे निर्णय़ अंतिम आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे. अशा प्रकारे वाद निर्माण करणं चुकीचं आहे.” अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा यांनी दिली.
काय म्हणाले होते अजित पवार?
“दिवंगत बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केले. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया”