कर्नाल (हरियाणा) – हरियाणातील कर्नाल येथे शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछुट लाठीहल्ल्यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये निर्माण झालेली कोंडी अखेर मिटली आहे. दोन्ही बाजूकडील चर्चेच्या चौथ्या फेरीत तोडगा दृष्टोपत्तीस आला आहे.
कर्नालमध्ये 28 ऑगस्टला घडलेल्या लाठीहल्ल्याची आणि आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांच्या त्यातील कथित सहभागाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. या लाठीहल्यात मरण पावलेल्या सुशील काजल या शेतकऱ्यांच्या दोन वारसदारांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
काजल यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली होती. मात्र, सरकारने तातडीने तशी कोणतीही तयारी दर्शवली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवेंद्रसिंह आणि शेतकरी नेते गुरनामसिंह चदुनी यांनी चर्चा झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले.
आयएएस अधिकाऱ्याचा लाठीहल्ल्यातील सहभागाची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशीची मागणी सरकारने मान्य केली आहे. जर त्यात हा त्याचा सहभाग आढळला तर ते अधिक परिणामकारक ठरेल, असे चदुनी म्हणाले. आयएएस अधिकारी देवेंद्रसिंह म्हणाले, शेतकरी हे आमचे बांधव आहेत. या निमित्त निर्माण झालेल्या मागण्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून परस्परमान्य तोडगा आम्ही काढला आहे.