खरीप व रब्बी हंगामात सीना धरणात सोडणार पाणी
नगर – कुकडी प्रकल्पातून सीना धरणास पाणी देण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. या आदेशामुळे कुकडी प्रकल्पातून रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात सीना धरणात पाणी देण्यात येणार आहे. या आदेशामुळे कर्जत, श्रीगोंदा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गावांना फायदा होणार आहे, अशी माहिती ऍड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेवाळे पुढे म्हणाले की, प्राधिकरणाने याबाबत 15 जुलै रोजी निकाल दिला आहे. या निकालात कुकडी प्रकल्पातून सीना धरणास पाणी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार कुकडी प्रकल्पातून रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात पाणी मिळणार आहे.
या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील 30, श्रीगोंदा तालुक्यातील 12 ते 15 गावे तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 15 गावांना याचा फायदा होणार आहे. सीना धरणाचा कमांडमध्ये समावेश करण्याचीही मागणी होती. परंतु, ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मागणी मान्य करण्यासाठी आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. यावेळी ऍड शिवाजी अनभुले, जलतज्ञ मिलींद बागल उपस्थित होते.