कर्जत – पुढील पाच वर्षांत राज्यातील 288 मतदारसंघातील विकासाबाबतचा अभ्यास जे जे लोक करतील त्या सर्वांना बारामतीच्या पाठीमागे कर्जत जामखेडचा नंबर दिसेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला. दुरगाव (ता. कर्जत) येथे शेतकरी मेळावा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी वर्ग व महिला यांना मार्गदर्शन करताना रोहित पवार बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी रोहित पवार यांनी तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून कसा प्रलंबित असल्याचे सांगत विद्यमान आमदारांनी येथील शेतीच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस प्रयत्न केले नाहीत, यामुळे या तालुक्याचे हक्काचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळाले नाही. स्वतः पुढाकार घेऊन कधीही पाणीटंचाईबाबत मिटिंग घेतली नाही. यामुळे तालुक्याला पाणी वाटपामध्ये मिळालेले हक्काचे पाणीही मिळाले नसल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली व भविष्य काळामध्ये या तालुक्याला शेतीसाठी हक्काचे पाणी मिळवून देईपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही मग सत्ता असो किंवा नसो आणि जर मी कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी मिळवून दिले नाही तर माझे नाव बदलून ठेवा अशी खात्री त्यांनी यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाला दिली.
यावेळी दुरगाव मधील ग्रामस्थांनी चारी खोलीकरण व दुर्गाव तलावातील गाळ काढण्यासाठीचे प्रस्ताव रोहित पवार यांना दिले. याच वेळी तातडीने रोहित पवार यांनी त्यांना दोन दिवसांमध्ये मशीन देऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. व्यापारी दुकानदार व वेगवेगळे व्यावसायिक यांच्यासाठी ही आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांमध्ये कर्जत जामखेडचा चेहरा पूर्णपणे बदललेला दिसेल व बाहेरच्या कंपन्यांनी इथे येऊन त्यांची कंपनी टाकून आपल्या येथील तरुणांना रोजगार मिळवून दिल्याचे चित्र पहावयास मिळेल असे सांगितले. यावेळी दुर्गाव सह परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.