वर्ष 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी या दिवशी म्हणजेच 13 जून रोजी भारताने दुर्गम असे तोलोलिंग शिखर सर केले होते आणि हा क्षणच या युद्धाचा प्रमुख टर्निंग पॉईंटठरला होता. आज या घटनेला 22 वर्षे पूर्ण होत आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यातून कारगिलला मुक्त करण्यासाठी तोलोलिंग शिखरावर विजय मिळवणे अत्यंत आवश्यक होते.
या मोहिमेमध्ये 13 जून रोजीच वीरगतीचा नारा गुंजला आणि या अवघड शिखरावर भारतीय सैन्याने कब्जा केला. या विजयाने युद्धाची दिशा बदलली होती आणि ते भारतीय सैन्याच्या बाजूने फिरले होते. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील नागवाईनचा खुशाल ठाकूर आणि त्याचा युनिट 18 ग्रेनेडियर यांनाच, पहिल्यांदा तोलोलिंग शिखर आणि सर्वोच्च शिखर टायगर हिलवर विजयाचा झेंडा फडकावण्याचा बहुमान मिळाला होता.
या युद्धाविषयी आपल्या आठवणींची पाने उलगडताना ब्रिगेडियर खुशाल ठाकूर (निवृत्त) आजही ही मोहीम विसरू शकत नाहीत. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा लढा खिशाल ठाकूर अनेक वर्षे देत होते. एके दिवशी अचानक त्यांच्या युनिटला ताबडतोब कारगिल येथे बोलविण्यात आले आणि तोलोलिंग शिखर जिंकण्याच्या मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
त्यांच्या नेतृत्वाखाली 18 ग्रेनेडियर्सच्या शूरवीरांनी या लढाईत त्यांचे कौशल्य असे काही सिद्ध केले की, युद्धाचे सारे चित्र भारताच्या बाजूने बदलले. तोलोलिंग शिखर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, 18 ग्रेनेडीयर्सच्या चार अधिकाऱ्यांसह 25 सैनिक शहीद झाले. तसेच राजपूताना रायफल्सच्या 3 अधिका अधिकाऱ्यांसह 10 सैनिक शहीद झाले.
कारण स्पष्ट होते, वर बसलेला शत्रू सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता आणि त्यामुळे प्रतिकाराची संधी मिळणे भारतासाठी दुरापस्त होते. सर्वप्रथम मेजर राजेश अधिकारी शहीद झाले. प्रचंड नुकसानानंतर कर्नल खुशाल ठाकूर यांनी स्वत: मोर्चा घेण्याचे ठरवून मोहीम यशस्वी केली.
13 जून 1999 च्या रात्री, 18 ग्रॅनाडायर्स आणि 2 राजपूताना रायफल्सने 24 दिवस रात्रंदिवस संघर्ष करून तोलोलिंग शिखर सर केले. पण तोलोलिंगचे यश खूपच महागडे ठरले. या संघर्षात लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन गंभीर जखमी झाले आणि शेवटी कर्नल खुशाल ठाकूर यांच्या मांडीवर आपले प्राण अर्पण करून वीरगती मिळाली.
महामहिम भारतीय राष्ट्रपती यांनी या विजयी आणि ऐतिहासिक मोहिमेसाठी 18 ग्रेनेडीयर्सना 52 शौर्य सन्मान प्रदान केले, जी भारताच्या सैन्याच्या इतिहासातील विक्रमी नोंद आहे. हवालदार योगेंद्र यादव यांना देशाचा सर्वोच्च वीर पुरस्कार “परमवीर चक्र’ देण्यात आला.
या व्यतिरिक्त 2 महावीर चक्र, 6 वीर चक्र, 1 शौर्य चक्र, 19 सेना पदके आणि इतर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासह कारगिल थिएटर ऑनर आणि टायगर हिल आणि तोलोलिंग बॅटल ऑनर 18 ग्रेनेडीयर्सना देण्यात आले. कर्नल खुशाल ठाकूर यांना युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले.
त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात आजचा दिवस म्हणजे “कारगिल विजया’च्या पायाभरणीचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्या सर्व शहिद अआणि वीर जवानांना सलाम!