नवी दिल्ली – पाकिस्तानला धूळ चारत कारगलिमधील केलेली घूसखोरी परतावून लावण्याच्या भारतीय लष्कराच्या शौर्याचा म्हणजेच ऑपरेशन विजयच्या यशस्वीतेचा दिवस. या दिवसाचे निमित्त साधत शहीदांना अभिवादन करत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास देशाने लष्कराला दिला. पाकिस्तानी लष्कर आणि मुजाहिद्दीन घुसखोरांना पिटाळून लावण्याच्या शूर जवनांच्या कहाण्यांचाही अनेक ठिकाणी पुनरूच्चार केला.
आमच्या सशस्त्र दलांनी 1999 मध्ये शौर्याची ही गाथा लिहली होती. याच गाथेतील एक ओवी म्हणजे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) गोविंदसिंग बिस्त. ते आपला मुलगा लेफ्टनंट हेमंतसिंह यांच्यासह पाकिस्तानशी एकाचवेळी दोन हात करत होते. योगायोगाने ते दोघेही एकाच विभागात होते. बाप लेकाने पाकिस्तानला धूळ चारण्यात महत्वाची भूमिका निभावत देशापढे शौर्याचा एक अनोखा आदर्श निर्माण केला.
या कमगिरीनंतर बिस्त आपल्या बटालीयनमध्ये परतले. तर हेमंत कारगीलमध्येच शत्रूवर नजर ठेवत कायम थांबला होता. 18 सप्टेंबर 2000 ला हेमंत यांच्या नेतृत्वाखालील कमांडो टीमला शत्रूचे तीन बंकर उद्ध्वस्त करायचा आदेश मिळाला. हा आदेश आपल्या सहकाऱ्यासमवेत हेमंत यांनी पार पाडला.
शत्रूचे तीनही बंकर उद्ध्वस्त केले. मात्र या वेळी झालेल्या धुमशानीत त्यांनी सात गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलल्या. त्यात जखमी झालेल्या हेमंत यांनी आपला जीवन मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित केले. या अतुलनीय साहसाबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले.
जर आम्ही हृदयात वसलेले असू तर आम्हाला मरण येतच नाही. तु देशासाठी आपले प्राण वेचलेस पण आमच्या हृदयाच्या प्रत्येक कंपनात तुझी आठवण आम्हाला साद देत असते. तुझ्या शांतीसाठी आम्ही कायम प्रार्थना करतो. तु आमच्या हृदयात कायमच असशील
– गोविंसदसिंग बिस्त
लेफ्ट कर्नल (निवृत्त)