सुनीता शिंदे
कराड – करोना विषाणू संसर्गामुळे भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना कराड बसस्थानक मात्र करोनाला आमंत्रणच देत आहे. कराडच्या “आयडॉल’ बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. करोना विषयीच्या जनजागृतीचा मागमूसही नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पायदळी तुडवण्याचे काम कराड आगारात राजरोस होत आहे.
कराड बसस्थानक या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. अनेक वर्षे रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना बऱ्याच गैरसोयींना सामोरे जावे लागले; परंतु बसस्थानकाचे नूतनीकरण होत असल्याने प्रवाशांनी ते सहनही केले. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना भरघोस निधी दिला होता. त्यांच्या पुढाकाराने अद्ययावत सुविधांनी सुसज्ज बसस्थानक उभे राहिले. गतवर्षी 6 जानेवारी रोजी या बसस्थानकाचे थाटामाटात उद्घाटन झाले. आतातरी चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, कराड आगार व्यवस्थापानाने ती धुळीला मिळवली.
बसस्थानक परिसरातील बाकड्यांची दोन-तीन महिन्यात मोडतोड झाली. येथे कचऱ्याचे प्रमाणही सातत्याने जास्त आहे. शौचालयांच्या अस्वच्छतेमुळे कायम दुर्गंधी पसरलेली असते. याबाबत अनेक तक्रारी होऊनही व्यवस्थापनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी परिसरात अनेकदा स्वच्छता अभियान राबवले आहे.
पालिकेवर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असल्याने बससस्थानकातील स्वच्छतेची जबाबदारी आगाराने घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिक व प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवरून उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, हणमंत पवार आदींनी आगारप्रमुखांना स्वच्छता ठेवण्याबाबत तंबी दिली तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
सध्या संपूर्ण देशभरात करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचे वारे वाहत आहे. यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक व्यवसाय, कार्यालये बंद असल्याने मुंबई-पुण्यात असलेले चाकरमानी गावी परतू लागले आहेत. त्यामुळे बसस्थानकात गर्दी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असतानाही कराड आगाराला त्याचे काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसते.
त्यांचे नेहमीप्रमाणे कामकाज सुरू आहे. बसस्थानक परिसरात तुटलेले बाकडी, फुटलेल्या फरशा, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त शौचालये, धूम्रपानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, पिण्याच्या पाण्याचा गळती लागलेला कुलर, ठिकठिकाणी पडलेला कचरा असे चित्र दिसत आहे. या सर्वांमध्ये करोना आजाराविषयी जनजागृती करणारा एकही फलक शोधूनही सापडत नाही.
दिसतोय ते फक्त अस्वच्छतेचा बाजार. जेथे अस्वच्छता तेथे करोना. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असतानाही कराड बसस्थानकाची भूमिका त्याच्या उलट आहे. नुकताच या आजाराने एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे याची दाहकता आणखीनच वाढली असून नागरिकांच्या मनातील भितीचे सावटही गडद झाले आहे. बसस्थानकातील अस्वच्छतेबाबत प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.