कराड – मारुतीबुवा कराडकर मठाचे अधिपती जयवंत पिसाळ यांचा माजी मठाधिपती बाजीरावमामा याने मंगळवारी (दि. 7) खून केला होता. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. तेव्हा, बंडातात्या कराडकर व जयवंत पिसाळ यांनी माझ्यावर खोटे आरोप करत मला मठाधिपती पदावरून खाली खेचले होते. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडातात्या आणि जयवंत या दोघांनाही संपवणार होतो.
मात्र, बंडातात्या एक दिवस आधीच पंढरपूरमधून निघून गेल्याने ते माझ्या तावडीतून सुटले. जयवंत एकटाच सापडल्याने त्याला संपवले, असा खळबळजनक जबाब बाजीरावमामाने पोलिसांना दिला आहे.
न्यायालयाने बाजीरावमामास दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मारुतीबुवा कराडकर मठाच्या अधिपती पदावरून गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. विश्वस्त व बाजीरावमामा यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे. गेल्या वर्षी 23 एप्रिल रोजी बाजीरावमामाने मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने यांच्या डोक्यात वीणा मारून त्यांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली.
त्यानंतर बाजीरावमामाला पोलिसांनी अटक करून तीन महिने कोठडीत ठेवले होते. त्यातून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा मठाधिपती करण्यासाठी तो मठाच्या सदस्यांना सतत धमक्या देत होता. त्यामुळे कराड पोलिसांनी बाजीरावमामावर हद्दपारीची कारवाई केली होती.
ती सल बाजीरावमामाला होती. या गोष्टीला बंडतात्या व जयवंत पिसाळ हे कारणीभूत असल्याच्या समजातून त्याने दोघांना संपवण्याचे ठरवले आणि मठात कीर्तन करण्याची परवानगी मागितली. या परवानगीवरून जयवंत पिसाळ आणि बाजीरावमामा यांच्यात दशमीला वाद झाला. तो वाद काही वारकऱ्यांनी मिटवला. मात्र, दुसऱ्याच दिवशी दुपारी बाजीरावमामाने जयवंत महाराजांबरोबर भांडण उकरून काढले. जयवंत महाराजांवर चाकूने वार करून खून केला होता.