वडगाव हवेली- बुधवारी दिवसरात्र झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतशिवारे जलमय होऊन ओढे-नाले तुडूंब भरून वाहत होते. वडगाव हवेली येथील लेंडोरी ओढ्याला पूर आल्याने कराड-तासगाव मार्गावरील दत्तकृपा पेट्रोल पंपाजवळील फरशीपूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री पासून गुरुवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे पाण्यामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच वाहने पलटी होऊन वाहनांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सकाळपासून रस्त्याचे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथील पाझर तलावही अगोदरच पूर्ण क्षमतेने भरला आहे.
अशातच काल झालेल्या पावसाने तलावातून बाहेर होणारा विसर्ग वाढल्याने गावच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या कोटर ओढ्याला ही पूर परिस्थिती निर्माण होऊन गावातील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व कोडोली फाटा येथील काही घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. दरम्यान, रस्त्यावरील पाण्यात अडकलेली वाहने प्रसंगावधान राखत परिसरातील नागरिकांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढली.
या आठवड्यात सलग परतीचा धुवॉंधार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे. तर जुन्या कराड तासगाव मार्गावरील दत्तकृपा पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या मार्गावर फरशी पूल आहे. याठिकाणी लेंडोरी नावाचा ओढा प्रवाहित आहे. याठिकाणी गत तीन वर्षांपासून गृहाघर-तासगाव रस्त्याचे काम ठप्प आहे. तसेच नैसर्गिकरीत्या वाहणारा लेंडीरी ओढा फरशी पुलापासून साधारण शंभर मीटर अंतरावर एक मीटर रुंदीच्या नाल्यात समावीष्ठ करण्यात आला आहे. वास्तविक मुळचा कमीतकमी दहा फूट रुंद असणारा ओढा एक मीटर गटरद्वारे पावसाळ्यात कसा प्रवाहित होणार याचा विचारही रस्ते बांधकाम करताना केलेला दिसत नाही.
गत महिन्याभरापूर्वी ही अस्याच पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. सिद्धेश्वर मंदिर डोंगर परीसरातून प्रवाहित असणारा हलगी शिवार, चव्हाण मळा, बौध्दवस्ती, गावंदर असा प्रवाहित असणारा लेंडोर ओढ्याचा प्रवाह कराड-तासगाव मार्गावरील एक मीटर गटरामध्ये समाविष्ट केल्याने ओढयास आलेल्या पुराची फुगीने पाणी सर्वदूर पसरले होते. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय झाली होती.
तसेच फरशी पुलाचे बांधकाम गत तीन वर्षांपासून रखडल्याने दरवर्षी याठिकाणी फरशी पूल पाण्याखाली जावून वाहतूक तासन्तास ठप्प होणे नित्याचे झाले आहे. ओढ्याचा प्रवाह रस्त्याचे कामात खंडीत झाल्याने शेतशिवार जलमय होऊन अनेक ठिकाणी ताली, बांध फुटून माती वाहून जावून तसेच पीके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे मध्यरात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत या रस्त्यावरून होणारी संपूर्ण वहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती.