उपनगराध्यक्षपदावरून दोन आघाड्यांबरोबर मैत्रीतही फूट
कराड – गुरूवारी झालेल्या कराड पालिकेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी वेगळी बैठकव्यवस्था करण्याची मागणी करून एकप्रकारे यशवंत-जनशक्ती व लोकसेवा आघाडीत फूट पडल्याचेच जाहीर केले. याचे मूळ कारण म्हणजे कराडच्या पदाधिकाऱ्यांना असणारी खुर्चीची हाव. महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अनेक गटांची धडपड सुरू होती. तशीच धडपड कराड पालिकेतही सुरू असून या खुर्चीपायी दोन गटात असणारी पदाधिकाऱ्यांची अनेक वर्षांची मैत्री तुटल्याचे दिसून येते.
कराड पालिकेत जनशक्ती आघाडीचे सोळा सदस्य निवडून येवून त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यांना अपक्ष असणाऱ्या कश्मिरा इंगवले यांनीही पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 17 झाली. यामध्ये अरूण जाधव यांच्या जनशक्ती आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी व जयवंत पाटील यांच्या लोकसेवा आघाडीचा समावेश होता. या आघाडीतून सर्वानुमते उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. सुरूवातीच्या काळात पालिकेतील सर्व निर्णय एकमताने घेतले जात होते. परंतु, काही महिन्यानंतर जयवंत पाटील यांची कार्यपद्धती फारशी कोणाला रूचली नसल्याने, राजेंद्रसिंह यादव समर्थक असलेल्या दहा नगरसेवकांनी जयवंत पाटील यांच्यापासून फारकत घ्यायला सुरूवात केली.
जयवंत पाटील यांच्याही ते लक्षात आल्याने त्यांनीही आपली ताकत वाढविण्यासाठी नगराध्यक्ष्या रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्या मदतीने डॉ. अतुल भोसले गटाशी हातमिळवणी केली. दिवसेंदिवस यादव समर्थक नगरसेवक व जयवंत पाटील यांच्यातील दुरी वाढतच चालली होती. वरवर हे सर्वजण आम्ही एकत्र असल्याचे भासवत असले तरी त्यांच्यात ती एकी कुठेच दिसत नव्हती. जयवंत पाटील यांनी आता उपनगराध्यक्ष पदाची खांदेपालट करावी, अशी अपेक्षा इतर सदस्यांची आहे. हेच या दोन्ही गटातील दरी वाढविण्याचे मूळ कारण ठरले.
खुर्ची ही प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. उपनगराध्यक्ष हे पद मानाचे असल्याने जयवंतराव पाटील यांना हे पद सोडू वाटत नसल्याची चर्चा नगरसेवकांसह नागरिकांमध्ये आहे. तर इतरांची आता दुसऱ्या कोणालाही तरी या पदावर संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र पाटील पद सोडायला तयार नसल्याने यादव समर्थक नगरसेवक त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. पालिकेच्या अलिकडील कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विधानसभा निवडणुकीतही राजेंद्रसिंह यादव यांच्यासोबतच इतर नगरसेवक दिसत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी छ. उदयनराजे भोसले यांच्यामुळे यादव समर्थक नगरसेवक व जयवंत पाटील समर्थक एकत्र असले तरी त्यांच्यात एकी मात्र कुठेच नव्हती. निवडणुकानंतर गुरूवारी पहिलीच सभा झाल्यानंतर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सवतासुभा घेतल्याने त्यांच्यात पडलेली फूट सर्वांसमोर स्पष्ट झाल्याचे दिसते.