सुरेश डुबल
कोण जिंकणार अन् कोण पडणार यासाठी उत्कंठा शिगेला
कराड – विधानसभा निवडणुकीचे मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदारसंघात होणाऱ्या राजकीय चर्चाचे रुपांतर हाय होल्टेज लढतीमुळे आता पैजांमध्ये झाले आहे. त्यामुळे कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघात पैजांचे जणू पेवच फुटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करु लागली आहे. 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोरदार तयारीत आहेत. सुरुवातीला मतदारसंघामध्ये हा येणार की तो येणार, याच्या संदर्भात फक्त चर्चा सुरु होत्या.
हॉटेलमध्ये, टपऱ्यांवर, पारावर तसेच जिकडे जाईल तिकडे निवडणुकीचा विषय. सरकार कोणाचे येणार? कोणाला किती मते पडणार? कोणाच्या किती जागा लागणार? याच्या चर्चा गेले पंधरा दिवसापासून सुरु आहेत. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. कारण जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर मध्ये मोठ्या लढती होत असल्याने येथील अंदाज भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकत आहेत. त्यामुळेच याचे रुपांतर आता पैजांमध्ये होऊ लागले आहे. आमचाच नेता येणार, आमचाच पक्ष सत्तेत असणार, आमच्या उमेदवाराला एवढीच मते पडणार अशा प्रकारच्या पैजा लोकांमध्ये लागत आहेत.
तर यांचे विरोधकही याला विरोध करत विजय तर आमचाच होणार आहे. असे म्हणत वाट्टेल त्या पैजा लावण्यास तयार झालेले आहेत. त्यामुळे राजकीय नव्हे तर सर्वसामान्य मतदारही पैजा लावून आपल्या नेत्याला, पक्षाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यामध्ये युवकांसह आबालवृद्ध ही मागे नाहीत. अगदी जेवणाच्या ताटात पासून ते रोख रक्कमेपर्यंत या पैजांचे स्वरुप दिसू लागले आहे. यात महिला तरी कशा मागे राहतील, त्यांनीही मग बचत गटात, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात या राजकीय चर्चांना पैजेचे स्वरुप दिले आहे.
अगदी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार इथपासून ते आपल्या मतदारसंघात कोण किती मतांनी निवडून येईल? याच्या पैजाही महिलांनी लावलेल्या आहेत. मात्र, महिलांनी त्यांचे स्वरुप मात्र चहा, नाष्टा इथपर्यंत मर्यादित ठेवले आहे. प्रचारासाठी अगदी जेमतेम दोन दिवस उरले आहेत. त्या पद्धतीने कराड दक्षिण मधील पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले व उदय पाटील हे तिघे तर कराड उत्तरेत बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम हे सहा प्रमुख उमेदवार निवडणूकीमध्ये समोरासमोर भिडत आहेत. अन्य पक्षाच्या व अपक्षांचा येथे निभाव लागणार नाही, हे या प्रचाराच्या रणधुमाळीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा उमेदवारांसाठीच कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदार पैजा लावताना दिसत आहे.