कराड -कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिप पिके घेतली जातात. गेल्या काही दिवसांपासून पाउस गायब झाल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला असून 2-4 दिवसात पाऊस झाला नाही तर चांगले आलेले खरीप पिके हातचे जाणार आहे.
कराड तालुक्यात प्रामुख्याने खरिपातील बाजरी, कांदा, मका, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पन्न चांगले असते. यावर्षी सूर्यफूल व भुईमुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून पिके जोमदार आहेत. बाजारात दरही तेजीत आहेत. मात्र जोमदार आलेल्या पिकांना पावसाने मात्र बगल दिली आहे. आगामी 3-4 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हाता तोंडाशी आलेली पिके हातची जाण्याचा धोका वाढला आहे.
यावर्षी प्रारंभापासून समाधानकारक पाणी उपलब्ध असल्यामुळे पिके जोमदार आली. पाउसही चांगला झाला. आता मात्र अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण चित्र बदलले आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतीपंपासाठी उपलब्ध असलेली वीज कधीच योग्य दाबाने व वेळेवर मिळत नाही. त्यातही ट्रान्स्फॉर्मर चोरीचे प्रमाण वाढल्याने पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी पिके जळून जातात. विजेची उपलब्धता नाही, मात्र वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनी अत्यंत कठोर भूमिका घेत असल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे.
कर्ज माफीची योजना ही शेतकऱ्यांचे समाधान करू शकली नाही. विशेषतः नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत योजनेची केवळ घोषणा शासनाने केली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नसल्याने आता कर्ज परतफेड न करण्याची भूमिका घेण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहेत.
त्यातच निसर्ग, शासन, वीज वितरण कंपनी, शेतमालाचे बाजारभाव, पिकावरील कीड रोग, पीक खर्चात सतत होत असलेली भरमसाठ वाढ आणि नैर्सगिक वातावरणातील सततच्या बदलामुळे हातची जाणारी पिके या परिस्थितीशी सामना करून बळीराजा मोडून पडला आहे.
शासन या परिस्थितीत शेतकऱ्याला कसा व कोणता आधार देणार, त्याची कशी सुटका करणार या चिंतेत सध्या शेतकरी असून पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे व मदतीच्या प्रतीक्षेत शासन निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अनेकांचे छोटे- मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उत्पन्नाची साधने ठप्प झाल्याने सर्वांचीच अवस्था बिकट झाली, करोना महागडे उपचार परवडेनासे झाले आहेत. यंदा सुरुवातीला चांगला पाउस झाला त्यामुळे तालुक्यातील खरीप पिके चांगली आली.
मात्र आचानक गायब झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक जळुण जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे बळीराजा पावसाची वाट बघत आहे.
==================
===============