सलग दुसऱ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नाला यश
मुंबई येथे व्हर्च्युअल पद्धतीने पुरस्कार प्रदान
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जल्लोष
पदाधिकाऱ्यांनी केला कर्मचाऱ्यांचा सन्मान
कराड, दि. 20 (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने सलग दुसऱ्या वर्षी देशात प्रथम कमांक मिळवला. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी निकाल जाहीर केला. या निकालाने कराड शहराचा पुन्हा एकदा संपूर्ण देशात बोलबाला झाला आहे. देशातील एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये कराड शहर अव्वल ठरले असून पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नाला खऱ्याअर्थाने यश मिळाले आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मुंबई येथे हा पुरस्कार स्विकारला.
कराड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सन 2018 व 2019 या दोन्ही वर्षात चांगली कामगिरी केली होती. 2019 मध्ये पालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावत कराडच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला होता. या पुरस्काराने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी या सर्वांनाच प्रोत्साहन मिळाले होते. त्यामुळे तो पुरस्कार स्विकारल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षीही प्रथम येण्याचा चंग सर्वांनी बांधला होता. त्यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू होते.
शहरातील नागरिकांनीही पालिकेच्या स्वच्छता अभियानाला उर्त्स्फूत व भरघोस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर राहिली आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही परिश्रम मोठे आहेत. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व गटनेते, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांचेही योगदान मोलाचे राहिले आहे. शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भुमिगत गटार, सांडपाण्यावर प्रक्रिया, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे. 2020 च्या सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवरील गुणांकनात स्थान मिळाल्याने यावर्षीही आपण प्रथम येणार अशी आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. कराड नगरपालिकेने शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील गुणांकन यादीत स्थान पटवले असल्याची महिती महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाकडून पालिकेस पत्राव्दारे देण्यात आली होती.
प्रभावी कामगिरीच्या जोरावर कराड नगरपालिकेने यंदाही बाजी मारत राष्ट्रीय पातळीवरील देशातील एक लाख लोकसंख्येच्या पालिकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. कराड शहराचा गुणांकन यादीत समावेश झाल्यानंतर याहीवर्षी कराड प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, गटनेते राजेंद्र यादव, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, राजेंद्र माने यांच्यासह पदाधिकारी यांनी व्यक्त केला होता.
मागील वर्षी सुमारे चार हजार शहरांमध्ये कराडचा प्रथम क्रमांक आला होता. याहीवर्षीही चार हजार शहरांमध्ये कराडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल झाले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्विकारला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनिषा म्हैसकर यांची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान, पालिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे थेट प्रक्षेपणचे नियोजन करण्यात आले होते. स्वच्छ सर्वेक्षणचा निकाल जाहीर होताच पालिका पदाधिकारी, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गेले वर्षभर केलेल्या कामाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मानही करण्यात आला. सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये लागोपाठ दुसऱ्या वर्षी कराड शहराला यश मिळाले आहे. याबद्दल सर्व कराड शहरवासीयांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
रोहिणी शिंदे,नगराध्यक्षा, कराड
सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाला असला तरी एवढ्यावर न थांबता यापुढील काळातही स्वच्छतेत कराड नगरपरिषद अग्रेसर राहून कराडकर नागरिकांना उत्कृष्ट नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.
राजेंद्र यादव,गटनेते, जनशक्ती आघाडी
कराड पालिकेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या उत्तुंग यशात पालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, शालेय विद्यार्थी यांचा मोलचा वाटा.
सौरभ पाटील,गटनेते, लोकशाही आघाडी