कराड – मार्च महिन्याअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने करवसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असते. पालिकेनेही आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी प्रयत्न केले. काहीवेळा धडक मोहीमही राबवल्याने दि. 31 मार्चपर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. अजुनही अडीच कोटी रुपयांची वसुली बाकी असून ती लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती करवसुली विभागप्रमुख उमेश महादर यांनी दिली.
यंदा पालिकेला 12 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. दि. 31 मार्चपर्यंत वसुली करणे क्रमप्राप्त असल्याने सुट्ट्यांदिवशीही वसुली सुरू आहे. तर यंदा वाढवून कर आलेल्या नागरिकांनी अपिल केले होते. अपिल केलेल्या नागरिकांनी आलेल्या बिलापोटीचे पैसे त्याचवेळी भरले होते. त्यामुळे पालिकेची वसुलीही होत गेली. त्यामुळे यावर्षी पालिकेला उद्दिष्ट गाठणे सोपे गेले आहे.
मात्र अजून अडीच कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने दि. 8 नंतर कर भरले नाहीत त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्वरित कर भरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. पालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी नागरिकांकडे गेले असता अनेकदा नागरिक संबंधित नगरसेवकांना फोन करून बिले देण्यासंदर्भात मुदत वाढवून घेतात. बिलाची रक्कम संबंधित नागरिकांकडे त्यावेळी उपलब्ध नसेल तर मुदतवाढ केली जात असली तरी अशी मुदतवाढ अनेकदा करून नागरिक स्वत:ला दिलासा देतात. मात्र बिले भरणे अनिवार्य असतेच. मात्र मुदत वाढ केल्यामुळे त्या बिलावरील व्याज वाढत जावून त्या मोठ्या रकमेच्या बिलाचा फटका संबंधित नागरिकास बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतवाढ करून घेण्यापेक्षा वेळेत बिले भरावीत जेणेकरून व्याजाचा बोझा त्यांच्यावर पडला जाणार नाही, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.