माजी चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांची माहिती
कराड – कराड जनता बॅंकेत 310 कोटींचा अपहार झाल्याचे आणि संचालक व बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या नावांवर मोठ्या प्रमाणात कर्ज काढली आहेत, असे गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र, बॅंकेत कसलाही अपहार झालेला नसून अपहार या शब्दाने बॅंकेला कधीच स्पर्श केला नसल्याचे माजी चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांनी सांगितले.
काही दिवसांपासून कराड जनता बॅंकेविरुद्ध अनेक बाबी बोलल्या जाऊ लागल्या आहेत. त्यावर पाटील यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ते म्हणाले, कराड जनता बॅंकेची काही कर्जदारांनी नियमित कर्जफेड न केल्याने बिकट अवस्था झाली आहे. बॅंकेतील संचालकांनी बारा वर्षांत कर्ज
काढलेले नाही. सध्या बॅंकेत 360 कोटींचे व्यवहार सुरू आहेत. 503 कोटींचे डिपॉझिट जमा आहे. 110.86 कोटीची गव्हर्न्मेंट सिक्युरिटी आहे. 250 कोटीची बॅंकेची मालमत्ता डिपॉझिटसह शिल्लक असून शंभर कोटी रुपयांचे नियमित कर्ज आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून दरवर्षी ऑडिट व रिझर्व्ह बॅंकेची तपासणीही झाली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार, अफरातफर अथवा बोगस कर्ज प्रकरणांचा उल्लेख नाही. याचा अर्थ बॅंकेमध्ये असे कोणतेही व्यवहार झाले नाहीत. कर्जदारांची कर्जे व व्याज नियमित वसूल न झाल्याने एनपीएमध्ये वाढ झाली आहे. अशा कर्ज खात्यांची तरतूद बॅंकेला करावी लागली आहे. परिणामी बॅंकेला तोटा झाला आहे. कर्जदारांनी सहकार्य केल्यास सहा महिन्यात बॅंक पूर्वपदावर येईल.