कराड (प्रतिनिधी) -विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात कराड तालुक्यातच शिक्षण महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा उपक्रम संपूर्ण राज्याने स्विकारला आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतूनच शिकलेले अनेक विद्यार्थी आज अधिकारी झाले आहेत, असे प्रतिपादन सहकार, पणन व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कराड यांच्या वतीने आयोजित केलेल्या कराड शिक्षण महोत्सवाच व शिक्षण दालनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. श्रीनिवास पाटील हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण, क्रिडा व अर्थसमितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, माजी सभापती सुहास बोराटे, सदस्य रमेश चव्हाण, ऍड शरद पोळ, काशिनाथ कारंडे, राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस कराड उत्तरचे अध्यक्ष प्रशांत यादव, बाळासाहेब निकम, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शालेय पोषण आहार अधिक्षक विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, चंद्रकांत निकम, लालासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. शाळांमधून विविध सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. आपल्या तालुक्यातील अनेक उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरत आहेत. देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदानही चांगले आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण महोत्सव घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीमध्ये आज शिक्षण महोत्सव साजरा होतो आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांवर संस्कार घडत आहेत. लहान वयात विद्यार्थ्यांवर झालेले संस्कार कायमस्वरूपी टिकतात.सातारला भव्यदिव्य परंपरा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सोयराबाई, सईबाई, महाराणी ताराबाई या महिला आपल्या जिल्ह्यातील आहेत. सातारचे स्त्रीधन सर्वात मोठे आहे. यावेळी त्यांनी शालेय जीवनातील विविध किस्से सांगितले.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, तालुक्याप्रमाणे जिल्ह्याचाही शिक्षण महोत्सव घेतला जाणार आहे. यामुळे आपल्या मराठी शाळांचा दर्जा उंचावणार आहे.इंग्रजी माध्यमातून अनेक विद्यार्थी गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी एक ड्रेसकोड केला जाईल. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी बसतील त्यांची सर्व शुल्कही जिल्हा परिषदेमार्फत दिली जाईल. यामुळे अनेक गरिब होतकरू मुले सहभागी होतील.
यावेळी सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले. अनंत आघाव व विजय गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
करोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन…
पालकमंत्री बाळासाहेब पाटील आपल्या भाषणात म्हणाले, आजकाल सर्व काही चायना मेड आहे. लोकांचे त्याकडे आकर्षण आहे. मात्र, आज तेथूनच करोना व्हायरस पसरत असून त्याची काळजी सर्वानी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग आहे. आजच्या बदलत्या जीवन शैलीत अशा अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे.