सहा वर्षाच्या चिमुकल्यासह आई वडील ठार
कराड (प्रतिनिधी) : करोनाचा वाढत्या विळख्यामुळे देशात लाॅकडाऊन असल्याने मुंबईतून दुचाकीवरून गावी येताना कुटुंबाचा अपघात झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळील मलकापूर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दुचाकी दुभाजकाला धडकून शाहूवाडी तालुक्यातील जांबुर गावातील दाम्पत्यासह त्यांचा सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला.
सर्जेराव भीमराव पाटील (३२) आणि पूनम सर्जेराव पाटील (२९) हे दाम्पत्य आणि त्यांचा सहा वर्षाचा मुलगा अभय अशी या मृतांची नावे आहेत. बुधवारी दि. २५ मार्च रोजी झालेल्या अपघातानंतर तिघांनाही कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान दोनच दिवसांत तिघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर जांबुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पाटील हे कुटुंबासह डोंबिवलीत राहत होते. ते मुंबईत एका फायनान्स कंपनीत कामाला होते. करोनाच्या महामारी विषाणूपासून प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते गावी परत येत होते. लाॅकडाउन व संचारबंदीमुळे गावी येण्यासाठी वाहन मिळत नव्हते, त्यामुळे पाटील यांनी २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता मुंबईतुन दुचाकीवरून गावी येण्याचा निर्णय घेतला.
ते सायंकाळी पाचच्या सुमारास मलकापूर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आले असता, त्यांची वेगात असलेली दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी कृष्णा हाॅस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान काही तासातच मुलगा व पतीचा मृत्यू झाला, तर शुक्रवारी रात्री पूनम पाटील यांचाही मृत्यू झाला. पाटील त्यांच्या पश्चात दोन विवाहित भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.