कापूरहोळ / दिवे -कापूरहोळ, दिवे परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापूरहोळ, कीकवी, सारोळा, कासुरडी या भागातील शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या परिसरात शेतकऱ्यांची कांदा काढण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ झाली तसेच सरपण काटूक वैरण झाकून ठेवण्यासाठी धावाधाव करावी लागली. गेले दोन दिवस या परिसरात ढगाळ वातावरण होत उष्णता निर्माण झाली होती.
या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
भोर तालुक्यातील भाटघर, कामथडी, खानापूर व निगुडघर उपकेंद्रातून येथून होणारा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता वीज पुरवठा कर्मचारी टप्याटप्याने वीज सुरू करीत होते.