कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसचा दिलेला राजीनामा हा अनपेक्षित नसला, तरी तो कॉंग्रेसला बसलेला आणखी एक धक्का आहे, असेच म्हणावे लागेल. गेल्या पाच महिन्यांत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे ते पाचवे नेते ठरले आहेत. यापूर्वी आरपीएन सिंह. अश्वनीकुमार आणि सुनील जाखड या तीन कॉंग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, हार्दिक पटेलही भाजपच्याच वाटेवर आहेत.
कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी गांधी कुटुंबांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नियुक्तीची स्पष्ट मागणी सिब्बल यांनी केली होती. कॉंग्रेस अंतर्गत बंडखोर गटातील (जी-23) सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले होते. राहुल गांधी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत नाहीत, त्यांची धोरणे चुकीची आहेत, अशा प्रकारच्या टीकेचा मारा सिब्बल यांनी पत्रकार परिषदांमधून आणि टीव्ही चॅनेल्सना दिलेल्या मुलाखतींमधून केला होता. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भोजनासठी जी-23 गटातील नेते तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांना बोलावून भाजपविरोधी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपल्या पक्षाच्या नेत्यांना न विचारता, असे उपद्व्याप करणे कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाने सहन केले नसते.
सिब्बल यांनी कॉंग्रसविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये न बोलता पक्षाच्या व्यासपीठावर मतभेद व्यक्त करावेत, असे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना सातत्याने बजावले होते. पक्षश्रेष्ठी आपल्याला भेटच देत नसल्यामुळे दुसरा उपाय काय, असा सवाल सिब्बल विचारत राहिले. परंतु एवढे करूनही सिब्बल यांची पक्षातून हकालपट्टी झाली नव्हती, हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षात एखाद्या नेत्याने असे काही केले असते, तर त्याची तुरंत हकालपट्टी झाली असती. सिब्बल हे चिंतन शिबिरातही दिसले नाहीत आणि कोणत्याही समितीत त्यांना जागा देण्यात आली नाही. माजी कॉंग्रेस नेते जितिनप्रसाद यांनी जेव्हा कॉंग्रेसला टाटा करून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा “द क्वेश्चन इज, विल हि गेट “प्रसाद’ फ्रॉम बीजेपी’, असे ट्वीट सिब्बल यांनी केले होते. आता सिब्बल यांनी पक्षत्याग केल्यानंतर, “हाउ इज द “प्रसाद’ मिस्टर सिब्बल’, असा प्रतिटोला प्रसाद यांनी सिब्बल यांना लगावला आहे. कॉंग्रेसमध्ये अनेक येतात आणि जातात. पक्ष सोडून जाणाऱ्यांना दोष देण्याची गरज नाही, कॉंग्रेस पक्ष स्वतःच्या ताकदीवर पुन्हा मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केली आहे.
वास्तविक सिब्बल हे जनाधार असलेले नेते बिलकुल नाहीत. परंतु तरीही अत्यंत प्रतिकूल काळात एका पाठोपाठ एक नेते पक्षाला निरोप का देत आहेत, याचा विचार कॉंग्रेसने केलाच पाहिजे. या विषयाला दुसरी बाजूही आहे. सिब्बल यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत दीड महिन्यात संपणार असून, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशातील 11 जागा 4 जुलैला रिक्त होत असून, या जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे दोनच आमदार असल्याने तेथून राज्यसभेवर कॉंग्रेसचा एकदेखील खासदार निवडून येऊ शकणार नाही. या स्थितीत सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशातून अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पाठिंबा द्यावा, म्हणून सपचे खासदार आझम खान यांनी मध्यस्थी केली, अशी बातमी आहे. खान हे नुकतेच तुरुंगातून जामिनावर बाहेर आले असून, सिब्बल हेच त्यांचे वकील होते. यापूर्वी सपला सायकल हे पक्षचिन्ह मिळावे, म्हणूनही सिब्बल यांनी न्यायालयीन लढाईत यशस्वी युक्तिवाद केला होता. परंतु याच्या बदल्यात आपल्याला उमेदवारी मिळाली, हे सिब्बल यांना मान्य नाही.
देशातील अनेक पक्षांसाठी न्यायालयात मी माझे वकिली कसब पणाला लावले होते. तेव्हा कोणीही मला उमेदवारी दिली असती, असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. एक गोष्ट मानली पाहिजे की, इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही आणि तसा तो ते करणारही नाहीत. सिब्बल हे दिल्ली व हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर असून, ते एकेकाळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. सुषमा स्वराज यांच्या विरुद्ध लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 1998 साली सिब्बल यांनी प्रथम राज्यसभेत प्रवेश केला. 2004 आणि 2009 साली नवी दिल्लीतील चॉंदनी चौक मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. विज्ञान, तंत्रज्ञान, आणि भूवैज्ञानिक खात्याचे ते केंद्रीय मंत्री होते. सिब्बल दूरसंचारमंत्रीही होते आणि 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे ते प्रथमपासून सांगत होते. त्यांचा हा दावा खरा ठरला होता. मात्र अयोध्येच्या राममंदिर प्रकरणाचा निकाल लोकसभा निवडणुकीनंतर लावावा, हा त्यांचा युक्तिवाद वादग्रस्त ठरला.
ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदेत सिब्बल हे दूर उभे असल्याचा पुरावा सादर झाल्यानंतर ते गडबडून गेले होते. कारण आपण त्या गावचेच नाही, असा आव त्यांनी आणला होता. सिब्बल यांनी एक चॅनेलही काढला आणि तो काही दिवसांतच बंद झाला. या चॅनेलच्या पत्रकारांचे पैसेही कसे थकवण्यात आले, हे त्यात काम करणाऱ्या पत्रकार बरखा दत्त यांनीच उघड केले होते.
राजीव गांधी असताना सिब्बल कॉंग्रेसमध्ये आले आणि आजही विचारांच्या दृष्टीने आपण कॉंग्रेसबरोबर असल्याचे ते ठासून सांगतात. कॉंग्रेसमध्ये नसलो, तरी भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणारे नेते लागतात. सिब्बल हे बौद्धिक आणि कायदेशीर आघाडीवर काम करणारे नेते आहेत. शिवाय अशा नेत्यांमुळे पक्षाची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण होत असते. तेव्हा, अशा उच्चभ्रू आणि वयस्कर नेत्यांना विचारतो कोण,असे म्हणणे बरोबर नाही. कारण अशी गळती चालू राहिल्यास, कॉंग्रेसमध्ये केवळ सुमार आणि खुज्याच व्यक्ती शिल्लक राहतील.