नवी दिल्ली – विराट कोहलीला संघातून बाहेर काढा असे मत व्यक्त केल्यावर महान गोलंदाज कपील देव यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्यामुळेच कपिल देव बॅकफुटवर आले असून कोहलीकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याची सारवासारव त्यांनी केली आहे.
कोहली सातत्याने अपयशी ठरत असेल तर त्याचे मोठे नाव व पुर्वपुण्याई पाहून त्याला संधी देत राहणे योग्य नाही, त्याच्याजागी नवोदित खेळाडूला संघात स्थान द्यावे अशी टीका कपिल यांनी केली होती. मात्र, त्यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला.
न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी तूम्हाला मिळाली व त्यासाठी तूम्हालाही संघात कायम ठेवले गेले हे कसे विसरता, अशा शब्दात चाहत्यांनी कपिल यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, रवीचंद्रन अश्विनला जर कसोटी संघातून सातत्याने वगळले जाते तर मग टी-20 संघातून अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीला का वगळले जात नाही, असा परखड सवाल माजी कर्णधार व महान गोलंदाज कपिल देव यांनी उपस्थित केला होता. तसेच
गेल्या काही काळातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर कोहलीचा वाटा काय आहे. त्याला जर सातत्याने अपयश येत असेल तर योग्य वेळी नवोदित खेळाडूला संधी देणे निवड समितीचे कर्तव्य आहे. कसोटी संघाची जेव्हा निवड करतात तेव्हा अश्विनला सातत्याने बाहेर बसवले जाते. परदेशातील वातावरणात अश्विन फारसा प्रभाव पाडू शकणार नाही असे सांगितले जाते मग तोच न्याय कोहलीच्या बाबतही हवा, असेही कपिल म्हणाले होते.