मुंबई – लॉकडाऊन नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांचा ताबा सीबीआयने घ्यावा, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. वाधवान कुटुंबिय हे लॉकडाऊन सुरू असताना खंडाळाहून महाबळेश्वला पोहचले होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होतीे. त्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.
कपिल व धीरज वाधवान यांची क्वारंटाईनची मुदत आज दुपारी 2 वाजता संपली. त्यामुळे सीबीआयने त्यांना ताब्यात घ्यावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे असे गृहमंत्र्यांनी आज फेसबुक संवादाच्यावेळी सांगितले. कपिल वाधवान हा डीएचएलएफ या वित्तीय संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याला ईडीने एका संशयास्पद व्यवहार प्रकरणात 27 जानेवारी रोजी अटक केली होती. त्याला 21 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर झाला होता.