कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत आला आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाकडे दुसऱ्या डावात 63 धावांची आघाडी असून त्यांनी शुभमन गिलच्या रुपात एक महत्त्वाची विकेट गमावली आहे. आजच्या दिवशी न्यूझीलंडच्या निम्म्या संघाला तंबूत धाडत 5 विकेट घेणारा अक्सर पटेल हिरो ठरला आहे.
बिनबाद 129 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केल्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी काही षटकं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी दोघांमध्येही छोटेखानी भागीदारी झाल्यानंतर अश्विनने यंगचा अडसर दूर केला. यंगने 214 चेंडूत 15 चौकार लगावत 89 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही.
कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स हे सर्व अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले. अक्सर पटेलने भारताला मोक्याच्या क्षणी महत्वाचे बळी मिळवून दिले. अखेरच्या फळीत टॉम ब्लंडेल आणि काएल जेमिसन यांनी मैदानावर तग धरत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारतीय गोलंदाजांनी एकाही न्यूझीलंडच्या जोडीला भागीदारी करण्याची संधी न देता पहिला डाव 296 धावांवर संपवला. भारताकडून अक्सर पटेलने 5, तर रविचंद्रन अश्विनने 3, तर उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
दुसऱ्या डावात भारतीय संघानेही सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतू काएल जेमिसनने शुभमन गिलचा बचाव भेदत त्याला क्लिन बोल्ड केले. अखेरच्या क्षणांमध्ये मोठा धक्का बसल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. परंतू यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवालने अखेरच्या सत्रातील काही षटकं खेळून काढत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.
संक्षिप्त धावफलक
भारताचा पहिला डाव ः 111.1 षटकात सर्वबाद 345 धावा.
न्यूझीलंडचा पहिला डाव ः 142.3 षटकात सर्वबाद 296 धावा (टॉम लॅथम 95, विल यंग 89, रॉस टेलर 11, केन विल्यमसन 18, काएल जेमिसन 23. अक्सर पटेल 5-62, आर. अश्विन 3-82, रविंद्र जडेजा 1-57).
भारताचा दुसरा डाव ः 5 षटकात 1 बाद 14 (मयंक अग्रवाल खेळत आहे 4, शुभमन गिल 1, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 1. काएल जेमिसन 1-8).
अश्विनचा पंचाशी वाद
मैदानावरील वादांसाठी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हा ओळखला जातो. त्याने पंचाशी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही वाद घातला आहे. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही अनेक वेळा पंचाशी बाचाबाची झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या प्रयत्नानंतरही हे प्रकरण न मिटल्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला हस्तक्षेप करावा लागला.