नवी दिल्ली – जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.
काँग्रेस परिवार म्हणजे, संघ परिवार नाही, जे आपल्या कुटुंबाला सोडून नवीन कुटुंब बनवण्यास सांगतात. काँग्रेस परिवार हा कुणालाही कुटुंब सोडण्यास सांगत नाही. महात्मा गांधी कस्तूरबांना घेऊन इंग्रजांशी लढले. मग त्यांना घर सोडावं लागलं का ? तर नाही. आंबेडकरही कुटुंबासोबत राहिले. इतिहास बघा, जेवढेही महापुरुष आहेत त्यांनी कधीच आपल्यापासून कुटुंबाला दूर केले नाही, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
दरम्यान देशात काही लोक फक्त लोक नसून ती एक विचारधारा आहे. ही विचारधारा या देशाची संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब कऱण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणीतरी म्हटलं होत की, तुम्ही तुमच्या शत्रुची, विरोधकांची निवड करा, मित्र आरोआपच मिळतील. मी माझ्या शत्रुची निवड केली. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या लोकतांत्रिक पक्षात मी सामील होत असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.