वरवंड – भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर आला होता, त्यामुळे कानगाव (ता. दौंड) येथील पूल पाण्याखाली गेला होता. याबरोबरच पुलाजवळील जमिनीचा भरावही वाहून गेला होता, त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र गुरुवारी (दि. 8) जेसीबीच्या साह्याने भराव पूर्ववत करून पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आल आहे. तर ओसरलेल्या पुराची पाहणीकरण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती.
सध्या होत असलेल्या पावसामुळे भीमा नदीत धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर आला होता. नदीचे पाणी परिसरातील लोकवस्तीच्या भागात आणि शेतीत घुसले होते. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे, तसेच नदीवरील पुलांनाही पुराचा फटका बसला; परंतु आता भीमा नदीतील पाणी कमी होऊन पूर ओसरू लागल्याने आता जनजीवन काहीसे पूर्ववत होत आहे. भीमा नदी नदीकाठच्या कानगाव (ता. दौंड) गावातील लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.