मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच वादात अडकली आहे. तिच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. मात्र आता कंगनाला पाठिंबा देण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. त्यात रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा देखील समावेश आहे.
रामदास आठवले कंगनाची पाठराखण केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल,असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कंगनाच्या समर्थनार्थ अमृता फडणवीस यांनी देखील कंगनाची बाजू घेतली आहे. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रणौतला पाठिंबा दर्शवला आहे.
कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.