मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला ‘वाय’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल कंगनाने अमित शहा यांचे आभार मानले आहे.
कंगना राणावत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आभारी आहे. देशभक्ताचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. सध्याचे वातावरण पाहता ते मला मुंबईला काही दिवसांनी जाण्याचा सल्ला देऊ शकत होते. मात्र त्यांनी देशाच्या मुलीच्या वचनाचा मान राखला. जय हिंद, असे म्हणत तिने गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
कंगना राणावतची बहिण आणि तिच्या वडिलांनी राज्य सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले की, ‘कंगनाची बहिण रंगोली (रंगोली चंदेल)ने काल मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. कंगनाच्या वडिलांनीही राज्यातील पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे मी डीजीपीशी राज्यात अभिनेत्रीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.’