मुंबई – नवी दिल्लीच्या सीमारेषेवर गोळा झालेले विविध राज्यांतील शेतकरी शेतीच्या प्रश्नांवर आंदोलन करीत आहेत, की त्यांचे इरादे निराळे आहेत, असा तिखट प्रश्न अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. आपल्या ट्वीटर संदेशात तिने आशिष सिंग यांचे ट्वीट रिट्वीट केले आहे. या मूळ ट्वीटमध्ये आकाश सिंग यांनी शेतकरी धरणे आंदोलनाचा फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये शेतकरी आंदोलकांच्या हातात असलेले फलक, अर्बन नक्षलवादी नेते, अतिरेकी आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे गुन्हे दाखल असलेल्यांच्या छायाचित्रांचे आहेत. या सर्व नेत्यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी शेतकरी आंदोलक का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हणजेच काही राजकीय शक्ती तर शेतकरी आंदोलकांचा वापर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी करत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ज्यांच्या सुटकेची मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत, त्यामध्ये गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, आनंद तेलतुंबडे, उमर खालीद, शर्जील इमाम आणि खालिद सैफी अशा वादग्रस्त व्यक्तींची नावे आहेत. या रीट्वीटवर कंगनाने म्हटले आहे की, असे काही पाहिले की दीर्घ श्वास घ्यायचा आणि डोळे मिटून घ्यायचे असेच वाटते आहे.