मुंबई : देशाला जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती असे वादग्रस्त वक्तव्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री राणावतने पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे विधान केले आहे. तिने देशाच्या स्वातंत्र्यावर तर भाष्य केलेच पण यावेळी तिने चक्क महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे.
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, ‘तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.’ कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, ‘जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.’
पुढे कंगना म्हणाली, ‘गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी. ‘
या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.