मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरली आहे. कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.
मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी कंगना व शिवसेनेदरम्यान सुरु असलेल्या शाब्दिक चकमकीमागे शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतचे ट्विट केले आहे. ते म्हणतात, “कंगना प्रकरण तर एक सोंग असून यामागे सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचे कारस्थान आहे. आणि हे सर्वकाही बेबी पेंग्विनला वाचवण्यासाठी सुरु आहे.”
यामध्ये नितेश राणे यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचे हे ट्विट आदित्य ठाकरेंना उद्देशून असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीही राणे यांनी, सुशांत व दिशा मृत्यू प्रकरणात एका बड्या नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
Alert! Alert!
Kangana toh ek bahana hai..
SSR aur disha case Se dhyan hatana hai..
Baby penguin ko bachana hai..Baki kuch nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 5, 2020
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून, “माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही”
“तसेच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादयक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच घ्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच.” अशी भूमिका मांडत सुशांत प्रकरणात नाव घेणाऱ्यांना सुनावले होते.