‘प्रभात’च्या बातमीची घेतली दखल : पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होणार
बेल्हे – कल्याण-नगर महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात वाढले असल्याची बातमी दैनिक “प्रभात’ने शनिवारी (दि. 7) प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज (दि. 7) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खड्डे बुजवण्याच्या कामाला त्वरीत सुरुवात करण्यात आली असून, पुढील आठ दिवसांत मार्गावरील सवर खड्डे बुजवण्यात
येणार आहेत.
यावर्षी झालेल्या परतीच्या धुवांधार पावसाने कल्याण-नगर महामार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर तालुक्यातील आणे, गुळुंचवाडी, बेल्हे बायपास, आळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने येथे अनेक अपघात झाले. या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतची बातमी “प्रभात’मध्ये प्रकाशित झाल्यावर खड्डे बुजवण्याचे काम त्वरीत सुरू करण्यात आले आहे. हे काम चालू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानचे वातावरण आहे. हे खड्डे बुजवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे अणे ग्रामस्थ प्रशांत दाते यांनी यावेळी सांगितले.
2019 मध्ये झालेल्या अपघाताची आकडेवारी
कल्याण- नगर महामार्गावर आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) तीस किलोमीटर च्या अंतरात 1 जानेवारी 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 पर्यंत 40 अपघात झाले आहेत. यामध्ये 10 गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, तर दुखापतीशिवाय 5 अपघात झाले आहेत. एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी 25 झाले आहेत. यात 20 पुरुष व 5 स्त्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून यात पाच पुरुष तर तीन महीला जखमी झाल्या आहेत.
जितेंद्र सिंह ग्रुप पुणे या कंपनीने हे काम सुरू केले असून, अणे घाटातून कामास सुरुवात केली आहे. सात ते आठ दिवसांत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
अशोक धंदरे, प्रोजेक्ट मॅनेजर, आळेफाटा