नुकतीच राज्यात शिवजयंती साजरी झाली. मी त्या दिवशी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. मी त्यांना सांगितले की शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली. यावर आपले मत काय आहे? सर मग विस्तृतपणे सांगू लागले की, आजही शिवजन्मावर वाद चालू आहे आणि तो म्हणजे सोळाशे सत्तावीस की सोळाशे तीस.पण सरकारने 1966 साली एक कमिटी नेमून शिवजन्माविषयी संशोधनकर्त्यांना नक्की तारीख ठरवायची विनंती केली. त्यानंतर पुढे अनेक दस्ताऐवज, मान्यवर, इतिहासतज्ज्ञ सर्व प्रकारच्या जुन्या नोंदी यांचे संशोधन केले गेले.
1996 मध्ये त्या वेळच्या सरकारातील सांस्कृतिक मंत्री प्रा. प्रमोद नवलकर यांनी अशा प्रकारे विविध विद्वान व इतिहास संशोधक त्यांना बोलावून त्यांना शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यास सांगितले व त्यातून शेवटी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख निश्चित झाली. नंतर देशमुख सरकारने विधानसभेत ठराव मंजूर करून एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीची तारीख निश्चित केली. तेव्हापासून 19 फेब्रुवारी या दिवशी सरकारी आदेशानुसार शिवजयंती साजरी केली जाते तसेच तिथीनुसार कुणालाही ती साजरी करण्याचा अधिकार आहे. अर्थात राज्य सरकारची कार्यालये व शाळा यांना 19 फेब्रवारी रोजी सुट्टी असते. काही संघटना तिथीप्रमाणेही साजरी करत आहेत.
मुळात आपण रामनवमी, विजयादशमी, वगैरे किंवा जन्माष्टमी म्हणजे आपल्या देवादिकांचे जन्मोत्सव व सण हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरे करत असतो. त्या प्रमाणेच थोरामोठ्यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करायचे ठरले होते.त्याप्रमाणे शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जात होती व त्याच दिवशी सुट्टी दिली जायची.
आता तिथीनुसार काही संघटना ती पुन्हा साजरी करतील हे ओघानेच आले. मुळातच अलीकडे राजकारण सर्वत्र हातपाय पसरत चालले आहे त्यामुळे अगदी गल्लीतील क्रिकेट असो किंवा दहीहंडी सर्वत्र नेत्यांचा गाजावाजा चालू असतो. अशा वेळी काहीतरी निमित्त साधून प्रसिद्ध होणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तिथीप्रमाणेही शिवजयंती जोरात साजरी होईल. पण मुख्य प्रश्न राहतोच की अशा थोरपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण यांतून नक्की काय घेतो? शिवजयंती तिथीने किंवा तारखेने कधीही साजरी करा परंतु ते करत असताना या युगपुरुषाने आपल्या कर्तबगारीवर स्वकीयशत्रू व परकीयांना नामोहरम केले व परकीयांचा हिंदुस्थान गिळंकृत करण्याचा रथ आपल्या सह्याद्रीमध्ये अडवून धरला होता.
परदेशातही शिवजयंती साजरी केली जाते याचे कारण महाराजांचे कर्तृत्व होय. आज सर्वत्र अराजकतेची परिस्थिती निर्माण होत आहे असे वाटते व “हम करे सो कायदा’ हे तत्त्व पुढे येत आहे. शिवजयंती साजरी करताना सर्वांनी व विशेषतः राजकीय नेत्यांनी एकदा शिवचरित्र वाचून पाहावे. तसेच आपण महाराजांचा एखादा तरी गुण आत्मसात करू शकतो का? व तसे करण्याचा प्रयत्न करावा व तीच खरी महाराजांना आदरांजली होईल.
उत्तम पिंगळे