उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर पळून जाईल.
वेताळ म्हणाला-
“अरे विक्रमा तू एवढा हुशार, मला सांग महाराष्ट्र देशी नुकतीच निवडणूक होऊन गेली. दोन मोठ्या पक्षांनी ती युती म्हणून लढली तर आणखी दोन मोठ्या पक्षांनी ती आघाडी म्हणून लढविली. निवडणूक संपली, निकालही लागला. त्यानंतर एक गट निवडणूकपूर्व युतीला स्पष्ट विजयही मिळाला. एवढे झाल्यावरही त्या पक्षांमध्ये आनंद नाही तसेच सत्ता स्थापनेचा दावाही अजून नाही. नव्या सरकारचा जल्लोष नाही, हा प्रकार मला समजला नाही. मी असे ऐकून आहे की त्या दोन पक्षांमध्ये राज्यप्रमुख कोण होणार व किती काळासाठी होणार, तसेच सत्तेचा समतोल वाटप होणार का यांच्यावर मतभेद आहेत असे ऐकले आहे. खरे तर त्यांची युती झाली म्हणजे हे सारे आधीच ठरलेले असणार? दोन्ही पक्षांनी एकत्र प्रचाराचा नारळ फोडला होता. पण युतीचे वातावरण पूर्वीसारखे राहिले नाही, असेही मला कळले.
पूर्वी म्हणे दोन्हीकडील वरिष्ठ नेत्यांचा दबदबा होता तसा आता राहिला नाही तसेच मागील वेळी निवडणूक ते वेगवेगळे लढले असल्याने कित्येक इच्छुकांना अधिकृत तिकीट दिले गेलेच नाही. मग दोन्ही पक्षांतून बंडखोर, अपक्ष, स्वतंत्र असे उमेदवार उभे राहिले. त्यातही यातून काही त्यांच्या मूळ पक्षाने पाठिंबा दिला व मित्र पक्षाचा उमेदवार पाडला. अर्थात हे दोन्ही पक्षांसाठी झाले. अमुक एक उमेदवार निवडून येण्यापेक्षा तमुक कसा पडेल किंवा तिसराच कोणी कसा येईल याकडे लक्ष्य दिले गेल्याचे समजले. एकूणच याचा परिणाम युतीवर झाला असे समजते. पण आता विजय होऊनही सत्ता स्थापन न करणे हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हे म्हणे सुशिक्षित राज्य आणि ही परिस्थिती आहे. यावर तुझे काय म्हणणे आहे विक्रमा?
विक्रम त्यावर म्हणाला, हे वेताळा तुझ्या विवेचनातच सर्व माहिती तुला माहीत आहे हे समजले; पण कित्येक वेळा काय होते, की शीर्षस्थ नेते बाजूला राहतात व खालचे स्वतःला सुपर नेता समजतात त्या वेळी हे घडते. तुला माहीत आहे की इंदिराजी एक उत्कृष्ट राजकारणी व शक्तिशाली पंतप्रधान होत्या याबाबत कुणाचे दुमत असणार नाही कारण त्यांचे व्यक्तिमत्त्वच तसे होते. पण 1974-75 च्या वेळी सत्तेचा कैफ त्यांच्याच पक्षातील कित्येकांना अगदी त्यांच्या चिरंजीवांनाही आला होता.
इंदिराजींच्या भोवती एक त्रिकूट सतत वावरत असे संजय, शुक्ला, बन्सीलाल हेच ते स्वतःला सुपर नेते समजत होते. शेवटी जून 1975 ला आणीबाणी जाहीर झाली व 1977 साली कॉंग्रेसचा इंदिराजींसह दारुण पराभव झाला. आज थोडीफार परिस्थिती तशीच आहे. शीर्षस्थ नेते शांत आहेत व दुसऱ्या फळीचे मुक्ताफळे उधळत आहेत. त्यावेळी इंदिराजींबरोबर संजय, शुक्ला, बन्सीलाल होते आज युतीतील ठिणगीचा भडका करण्यामध्ये संजय, विनायक, मिलिंद आहेत व दुसऱ्या पक्षाकडेही तसेच नेते आहेत. केवळ दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी खालच्या सर्वांना गप्प राहण्यास सांगितले तरी प्रश्नांची उकल होईल. कधी कधी विशिष्ट काळ आणि वेळ जाऊ देणे हे सुद्धा एक प्रकारचे औषध असते. कळले? विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच खरे सत्य आहे हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.