कलंदर : उत्तम पिंगळे
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी गावातील मोजके लोक ग्रामपंचायत कार्यालयासमोर वडाच्या पारावर जमले.
काही ग्रामपंचायत सदस्य, गावचे मास्तर, काही छोटे-मोठे धंदे करणारे, गावपुजारी असे सर्व सरपंचांची वाट पाहात होते. सरकारने मोठे काही पॅकेज घोषित केल्यामुळे सरपंच पंचायत समितीत आढावा घ्यायला गेले होते. बबन थोड्याच वेळात चहा घेऊन येतो.
तेवढ्यात धुरळा उडवत सरपंचांची चारचाकी गाडी येते. सरपंच, त्यांचा उजवा हात व ग्रामपंचायत सदस्य पैलवान धान्या उतरतात. सरपंच समोरील खुर्चीत जाऊन बसतात. रामराम, नमस्कार होतो. बबन चहा वाटपाला सुरुवात करतो. महिला सदस्या राधाबाई सरपंचांना विचारतात, “काय साहेब, झाली का पंचायत सभापतीची भेट?’
सरपंच हळूच चहाचा घोट घेऊन बोलायला सुरुवात करतात. “छा… काय ती पंचायत समितीमध्ये गर्दी. कित्येक गावचे सरपंच आले होते. आधी निरोप आला होता की सभापती साडेबाराच्या आसपास येतील. आम्ही आपले बसलो तेथेच चहापाणी घेत. बरेच जण एकमेकांशी बोलत होते. सरकारने वीस लाख कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. थोडे तरी आपल्या गावाला मिळंल. आम्ही तेच म्हणत होतो. मग पंचायत समितीचा शिपाई ओरडत आला की सभापती आता कलेक्टर ऑफिसला गेलेले आहेत. आज काही येणार नाहीत. झालं सगळ्यांचा धीर गेला. सकाळपासून आम्ही वाट पाहात होतो. इतक्यात उपसभापती समोर आले व म्हणाले, आता प्रत्येकाने आपल्या गावात काय काम करायचे ते वेगवेगळ्या कागदावर लिहा, फक्त चार. माझ्याकडे द्या. उद्या सभापतींसमोर आम्ही ते ठेवू आणि निघा तुम्ही. शेवटी मी चार कामे लिहून उपसभापतींकडे दिली’.
विरोधी सदस्य संग्राम विचारतो, “काय लिवलं साहेब मग आपण?’ त्यावर सरपंच म्हणतात, “एक म्हणजे गावात रस्ता दुरुस्ती’. ते संपायच्या आत संग्राम बोलतो, “पण डिसेंबरलाच आपण रस्ता केला होता. तुमचाच तर मेव्हणा कॉन्ट्रॅक्टर होता?’ तेवढ्यात पैलवान धान्या संग्रामाच्या मागे येऊन उभा राहतो. “दुसरे गावातील दिवाबत्तीची सोय’. त्यावर राधाबाई म्हणतात, “मागच्या वेळी तुम्ही ते येलेडी का फिलेडी लावले आहेत ते बेस चालतात की?’ सरपंच रागीट नजरने कटाक्ष टाकतात. “तिसरं म्हणजे समाज मंदिर दुरुस्त करणे’. त्यावर मास्तर म्हणतात, “आपले समाज मंदिर तर एकदम चकाचक आहे?’ पैलवान रागाने मास्तरांकडे पाहू लागतो. “शेवटी गावात जंतुनाशक फवारणी, मास्क, सॅनिटायझर वगैरे पुरवा असं लिवलयं’. “बघू आता’, असं म्हणून चहा संपवून उठून निघूनही जातात. पहिलवान थोडा मागे थांबून सर्वांना घरी जाण्याची खूण करतो व सर्व निघतात.
मास्तर व माजी सैनिक गणा बरोबर निघू लागतात. गणा विचारतो, “काय मास्तर, काय सांगितले सरपंचाने पाहिलं का?’ मास्तर म्हणतात, “होय रे बाबा, अरे काय झालेलीच कामे सांगितलीत पुन्हा. रस्त्याऐवजी आपला स्मशानघाट दुरुस्ती व स्मशानाकडे जाणारी वाट चांगली करायला पाहिजे. दिव्यांऐवजी आपली पाणीपुरवठा योजना बंद आहे ते पाहायला हवे. समाज मंदिरापेक्षा शाळा दुरुस्ती व शाळेतील शौचालय तसेच मुलांसाठी क्रीडांगण हे महत्त्वाचे आहे. बाकी फवारणी वगैरे ठीक’. त्यावर गणा म्हणतो, “मग सरपंचानं असं का केलं?’ त्यावर मास्तर म्हणतात, “अरे गणा तू आताच गावात आला आहेस. येथे सर्व राजकारण आहे. तळे राखी तो पाणी चाखी.