उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, “”राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक, तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडांवर पळून जाईल.”
वेताळ म्हणाला – विक्रमा, तुला माहीत आहे की महाराष्ट्रदेशी निवडणूक होऊन निकाल लागूनही एवढे झाले पण कुणीही सत्ता स्थापण्यास पुढे आले नाही व शेवटी राष्ट्रपती राजवट लागू झाली. सत्तेसाठी वेगवेगळी समीकरणे झाली आहेत. लढताना ते ज्या मुद्द्यांवर लढले ते राहिले बाजूला आता फक्त खुर्चीसाठी चढाओढ चालू आहे. त्यात अनेक नेते शेतकऱ्यांच्या शेतावरून प्रत्यक्ष फोटोसेशन करून त्यांना उगाच धीर दाखवत आहेत.
दुसरीकडे आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून अनेक पक्षांनी आपापल्या आमदारांना आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये विविध ठिकाणी ठेवले आहे. दुसरीकडे हेच नेते शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन लढणार आहेत.किमान सर्वसाधारण कार्यक्रम घेऊन आता पुढे येणार असे समजते. बरं मग यात मतदारांचे काय ज्यांनी एका गटाला स्पष्ट बहुमत दिले असूनही त्यांच्या अपेक्षेचे सरकार येऊ शकत नाही. मग या मतदारांच्या हातात काय उरले आहे? कुणीतरी म्हणे कोर्टात दावा दाखल केलेला आहे. जे पक्ष एकमेकांना सतत पाण्यात पाहत होते ते केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. यांचे एकमेव कारण म्हणजे सत्ता आणि फक्त सत्ता होय. यास एकीकडे लोककल्याण नाव देऊन जनतेचा विश्वासघात नव्हे काय?
यावर विक्रम म्हणाला, “वेताळा तुला माहीत आहे की आता राजकारण पूर्वीसारखे राहिले नाही. “पैसा फेको तमाशा देखो’ असे सुरू झालेले आहे. त्यामुळे सामान्य माणूस यापासून खूप दूर गेलेला आहे. आताची परिस्थिती त्यात जे नेते पडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे वागत असल्याने झालेली आहे. पूर्वी पक्षाची ध्येयधोरणे होती व शक्यतो पक्ष आपल्या धोरणांशी फारकत घेत नसे. पण अलीकडे सत्ता ही अफूची गोळी आहे व त्यासाठी वाटेल तसे पक्ष वागत आहेत याला कोणताही पक्ष अपवाद नाही.
नुकतेच कर्नाटकात पक्ष बदललेल्या आमदारांना अपात्र ठरवले गेले. आता तेच लोक सत्ताधारी गटातून निवडणूक लढणार आहेत. प्रचंड पैसा ओतला जाणार आहे. त्याचे कुणाला काही वाटत नाही. आताही आमदारांचा खर्च तुमच्या आमच्या पैशातून होतो हे लोकांना समजत नाही. कुणी राजकीय पक्ष स्वतःचे पैसे टाकून असे करत नाही. शेवटी पक्षांना मिळणाऱ्या देणग्या या त्या सरकारातून काहीतरी पदरी पाडून घेण्यासाठी दिल्या जातात व शेवटी त्याचा भार करदात्यांवर येतो.
लोक मतदान करतात व आता म्हणतात काही खरं नाही. कारण सारेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि म्हणूनच “नोटाला’ मिळणाऱ्या मतदानात क्रमाने वाढ होत असताना दिसत आहे. समाजकारणाची जागा राजकारणाने व राजकारणाची जागा सत्ता व अर्थकारणाने हिसकावून घेतले आहे एवढे नक्की.
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, “”हे राजा तू म्हणतोस तेच खरे सत्य आहे हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो,” असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.