नवी दिल्ली – या वर्षीची कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केली. भारत आणि चीन यांच्यातील लोकसंपर्काच्या दृष्टीनेहीं ही यात्रा महत्वाची आहे असे त्यांनी म्हटले आहे. यात्रेच्या उद्घाटनाच्या निमीत्ताने जवाहरलाल नेहरू भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा चीनचा राजदूत होतो त्यावेळी मी स्वता या तीर्थ क्षेत्राला भेट दिली आहे.
1981 पासून चीनच्या सहकार्याने ही यात्रा सुरू करण्यात आली असून दरवर्षी या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या यात्रेसाठी उत्तराखंड, सिक्कीम आणि दिल्ली सरकारचेही चांगले सहकार्य लाभते असे त्यांनी यावेळी नमूद केले. यंदाच्या यात्रेसाठी विदेश मंत्रालयाकडे एकूण 2996 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 624 ज्येष्ठ नागरीक आहेत. उत्तराखंडच्या लिपुलेख मार्गाने 18 तुकड्यांमधून या यात्रेकरूंना रवाना केले जाणार आहे. हे तीर्थ क्षेत्र 19 हजार 500 फूट उंचीवर असून अत्यंत लहरी हवामान आणि दुर्गम प्रदेशामुळे ही यात्रा अत्यंत खडतर समजली जाते.