कोल्हापूर – खारघर येथून कोल्हापुरात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थी राहूल पोळ यांना किणी टोल नाक्यावरच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने पैसे देण्याची व्यवस्था पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अल्पावधीत पूर्ण झाली.
खारघर (मुंबई) येथील दिव्यांग व्यक्तींचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे होते. लॉकडाऊनमुळे त्यांना खारघर येथेच अडकून पडल्यामुळे कोल्हापुरातील बॅंक खात्यातील पैसे काढणे शक्य झाले नाही. पदरी थोडेफार असणारे पैसे लॉकडाऊनच्या काळात खर्च झाले अन त्यांच्यावर अडचणीची वेळ आली होती.
त्यामुळे रितसर परवानगी घेऊन दिव्यांग लाभार्थी राहूल पोळ दिव्यांगासाठीची गाडी क्रमांक चक-05- इत-3717 ने खारघरहून कोल्हापूर गाठले. अर्थात त्यांना लॉकडाऊनमुळे किणी टोलनाक्यावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अडविण्यात आले.
ही बाब पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कानावर पडताच त्यांनी या अडचणीत सापडलेल्या आणि इतक्या लांबचा प्रवास करुन थकलेल्या दिव्यांग बांधवाशी किणी टोल नाक्यावरच संपर्क साधून त्यांची हकीकत जाणून घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यामुळे या दिव्यांग बांधवांना लाखमोलाचा आधार मिळाला.