उत्तम पिंगळे
काल सरांकडे गेलो तर ते शांत बसले होते. काही तरी लिहीत होते. मी आत जाऊन निमूट समोर बसलो. किती तरी वेळ त्यांचे लक्षच नव्हते, मग मला बघून म्हणाले, अरे आपण कधी आलात? मी म्हणालो, आत्ताच आलो. कोणत्या विचारात मग्न आहात आपण? सरांनी फक्त मान डोलावली. मग सर म्हणाले, कायदे अंमलबजावणी बाबतीत आपण खूपच मागे आहोत. मी म्हणालो मला काही समजले नाही. मग सर म्हणाले –
हैदराबादमधील निर्भया प्रकरणाबाबत बोलत आहे. सगळे प्रकरण वाचून मन एकदम विषण्ण झाले आहे. म्हणजे त्या वेळी त्या मुलीने तिथे असणे हा तिचा दोष मानावा काय? आपण नेमके कोणत्या दिशेने जात आहोत? म्हणून म्हणतो यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायलाच हवा. केवळ श्रद्धांजली, मूक मोर्चा व मेणबत्त्या लावण्याचा अती सोज्वळपणा आपल्याला आता सोडायलाच हवा. नाही तर म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, सोकावतो काय सोकावला आहेच. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना जबर शासन ताबडतोबीने झाले पाहिजे.
आजकाल सोशल मीडिया एवढा बोकाळला आहे की लहान सहान मुलांनाही गुन्हा वैगरे लवकरच समजू लागतो. अलीकडची मुले तर लवकरच मॅच्युअर्ड होत आहेत. म्हणूनच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना नाबालिक हे वय सुद्धा आता खाली आणणे आवश्यक आहे.
दुसरीकडे आपण बघू शकता की राजकीय दावे किंवा धार्मिक बाबतीत कोर्ट रात्री अपरात्री वा रविवारीही काम करते मग अशा गुन्ह्यांच्या वेळी तात्काळ सुनावणी का होत नाही? आता लोक क्षोभ आहे नंतर गुन्हेगारांनाही मीडियामार्फत सहानुभूती मिळू लागते. मीडियाच त्यांच्या घरची परिस्थिती व डिटेल बातम्या देत राहते. म्हणूनच अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा निकाल ताबडतोब लागला पाहिजे. अशा गुन्हेगारांना वकील मिळणे म्हणजे वकिली हा केवळ व्यवहार उरला आहे.
म्हणूनच अशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल व चौकशी ताबडतोबीने व्हावी. आता या जर लोकांनी गुन्हा कबूल गेला आहे मग मिथ्थ्या कोर्टबाजी करण्यात काय अर्थ आहे? ताबडतोब सुनावणी होऊन त्यांना फाशीची शिक्षा देणे योग्य होईल. हायफाय गोष्टी आणून काही माणसे एसीमध्ये बसून मानवाधिकाराच्या गोष्टी करत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. गुन्हेगारास कोणताही धर्म नसतो असे म्हणतात, पण अलीकडच्या गुन्हेगारीतील वाढ बघता तोही मुद्दा समोर येणे आवश्यक आहे. बऱ्याच गुन्हेगारांनाच कवच मिळते. कायद्याची अंमलबजावणी जर ताबडतोबीने होत नसेल तर मग ते कायदे काय कामाचे? जस्टीस डिलेड् इज जस्टीस डीनाइड्…