केंदूर – आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील हे प्रत्येक निवडणुकीला केंदूर गावात येतात. कळमोडी धरणाचे पाणी केंदुरला देण्याचे आश्वासन देऊन मतदारांना गाजर दाखवून मतदान मिळवतात. स्वतःची पोळी भाजून घेतात, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड यांनी केला आहे.
ते म्हणाले की, ज्या कामाचे भूमिपूजन गेल्या लोकसभा निवडणुकीत केले. त्याच कामाचे भूमिपूजन आता विधानसभेच्या तोंडावर करीत आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे नेहमीच आमदार वळसे पाटील श्रेय घेतात. गेल्या दहा वर्षांत वळसे पाटील यांच्यामुळे आमच्या 39 गावांचा विकास खुंटला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षे तसाच भिजत पडला आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे हाल केंदूर आणि परिसरातील जनता अनुभवत आहे. गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी थिटेवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, स्थानिक आमदारांनी आश्वासन देण्यापलिकडे काहीच केले नाही, असा आरोप केंदूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गायकवाड यांनी केला आहे.