मदन भोसले : विकासकामांचा डोंगर उभा केल्याच्या वल्गना
कवठे – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चार महिन्यात कोट्यवधी रूपयांचा निधी वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यांसाठी आणला. मात्र, गेल्या दहा वर्षात विकासाचा डोंगर उभा केला असल्याच्या वल्गना करणारे विद्यमान आमदार ग्रामपंचायतीपासून केंद्रशासनापर्यंत सर्व निधींचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा घणाघात वाई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांनी मकरंद पाटील यांचे नाव न घेता केला.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून आंतरराष्ट्रीय निधी आणल्याचा दावा त्यांनी केला नाही, हा त्यांचा चांगुलपणा म्हणावा लागेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. परखंदी येथे झालेल्या कोपरा ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रतनसिंह शिंदे, सचिन जायभाय, शिवसेना वाई तालुकाध्यक्ष किरण खामकर, अल्पसंख्यांक मंडळाचे जिल्हाध्यक्ष सादिकभाई शेख, आरपीआयचे वाईचे अध्यक्ष युसुफ बागवान, मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मदन भोसले म्हणाले, दहा वर्षात विद्यमान आमदारांना तिनही तालुक्यात उठावदार काम करता आले नाही. ज्या विकासकामांशी आपला संबंध नाही. ते काम मी केले नाही, अशी म्हणायची त्यांची दानत नाही. विकासकामाचे
फुकटचे श्रेय घेण्यातच त्यांची दहा वर्षे गेली. त्यांचा हा उद्योग जनतेच्या लक्षात आला आहे. संपुर्ण मतदार संघात त्यांच्या फसव्या विकासाची लक्तरे जनतेकडूनच वेशीवर टांगली जात आहेत, असा नाकर्ता लोकप्रतिनिधी जनतेला नको आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. मतदार संघाच्या व्यापक हितासाठी प्रवाहाबरोबर राहिले पाहिजे, राष्ट्रीय विचारधारा असलेल्या भाजपची पाठराखण केली पाहिजे.
देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट केले पाहिजेत, भाजप सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगिण विकास होऊ शकतो, ही भावना उराशी बाळगुन उदयनराजे भोसले आणि मी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील पाच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून उदयनराजे भोसले व मला प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे आणि परितर्वनाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहनही मदन भोसले यांनी यावेळी केले.
शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, महेश महांगडे, चंद्रकांत सुर्यवंशी आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. परखंदीसह शेंदुरजणे गणातील रतनसिंह शिंदे कुटुंबियांनी या सभेला जमविलेली हजारोंची गर्दी विरोधकांना धडकी भरायला लावणारी होती. या सभेमध्ये तरूणांच्या एकच वादा मदनदादाच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला. कोपरा सभेला परखंदी व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित
होत्या.