मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला. यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता एका म्हणीचा आधार घेत बोचरी टीका केली.
आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत यांनी,“समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही,” अशी टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचे फोटो पाहिले. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
“समाज माध्यमांवर लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात एका म्हणीचा उल्लेख आहे की, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे,” असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले, “शिवसेना ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही. तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे.” “या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षाची व्याख्या काय? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे,” असेही संजय राऊतांनी नमूद केले.