ओझर : धालेवाडी (ता. जुन्नर) येथील एक विवाहसोहळा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून रविवार (दि. 12) पर्यंत वधू-वरांसह 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 30 जण संशहित असून तब्बल 98 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने हा विवाह सोहळा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे लग्नसोहळे आता कोरोनाचे माहेरघर ठरणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
या विवाहास पुणे, मुंबई, चाकण, भोसरी, जुन्नर तालुक्यातील अनेक गांवातील 50 पेक्षा अधिक लोक तसेच या कुटुंबातील अनेक नातेवाईक उपस्थित होते. याच विवाह सोहळ्यात एखादा कोरोनाबाधित नातेवाईक आला असून त्याच्यापासून कोरोनाचा प्रसार झाला असल्याची शंका व्यक्त होत आहे.
विवाहसोहळा ज्या दोन कुटुंबीयात झाला त्याच कुटुंबीयातील नववधू-वर, त्यांच्या घरातील आई, वडील इतर नातेवाईक यांचेच रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हिवरे बुद्रुक येथे 4 व धालेवाडी तर्फे हवेली येथे 14 रुग्ण सापडल्याने ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी घोषित केली. त्यामुळे या गावांमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचा धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
हिवरे बुद्रुक 4, धालेवाडी तर्फे हवेली 14, शिरोली बुद्रुक 3 असे आतापर्यंत 21 बाधित रुग्ण आढळून आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी हिवरे बुद्रुक येथून 21, शिरोली बुद्रुक येथून 3 व धालेवाडी येथून 6 असे संशयित लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले आहेत. तसेच तीनही गावांमिळून 98 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यावर डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक एस. एम. गुंजकर, आरोग्यसेविका अयोध्या हांडे व आरोग्यसेवक अजय कासवेद उपचार करत आहेत.
… “नको रे बाबा’
जर लग्नसोहळ्यांद्वारे कोरोनाची साखळी पसरवण्यात हातभार लागत असेल तर अनेक कार्यमालकांना कोरोनाच्या काळात लग्न सोहळे व इतर धार्मिक विधी “नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
‘लोक स्वयंशिस्त पाळत नसून कारण नसताना अनेक विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम व इतर विधीमध्ये सहभागी होत असल्याचे आढळून येत आहे. अशा ठिकाणी लोकांनी जाणे टाळावे अन्यथा करोनाचा प्रसार ग्रामीण भागात वाढतच राहणार आहे. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास कळवून सहकार्य करावे.’
– डॉ. वर्षा गुंजाळ, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वारुळवाडी
‘प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने केलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.’
– परशुराम कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक, ओतूर पोलीस ठाणे