जुन्नर – जुन्नर ला फार मोठा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा लाभला असून निसर्गाचे देखील भरघोस वरदान लाभलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, अष्टविनायकांपैकी दोन गणपती, खिरेश्वर, कुकडेश्वर येथील श्रीशंकर महादेवाची मंदिरे,कुलदैवत असणारे वडज आणि धामनखेल येथील श्री खंडोबा यांची मंदिरे, पारुंडे येथील ब्रम्हनाथाचे मंदिर तसेच येथे भरनारा कुंभमेळा,नाणेघाट,दाऱ्याघाट जुन्नर तालुक्यात आहे तसेच निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्यची उधळण केलेला दुर्गावाडी,आंबोली तसेच माळशेजचा परिसर,खाद्यसंस्कृतीमध्ये मासवडी, आणेची आमटी इ.जुन्नरची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
याच जुन्नर तालुक्यात सातवाहन कालीन दोन हजार वर्षां पुर्वीच्या कालखंडातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत.
जुन्नर मध्ये एकुण २५० पेक्षा जास्त लेणी असुन त्या ऐतिहासिक जुन्नर शहरापासुन काही अंतरावर शिवनेरी,तुळजा,मानमोडी,लेण्याद्री व सुलेमान लेणी या गटात विभागलेल्या आहेत. यापैकी
तुळजा लेणी हि महाराष्ट्रातील आद्य लेणीं पैकी एक आहे.तुळजालेणी मध्ये असलेल्या स्तुपाची संरचना हि अन्यत्र कुठेही आढळुन येत नाही. स्तुपाभोवती बारा अष्टकोनी खांब असून छत घुमटाकार आहे.
मानमोडी डोंगराचे नाव मानमुकद असल्याचा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये आढळतो.या डोंगरावर भिमाशंकर,अंबा अंबिका आणि भूतलेणी लेणी समूह आहे. अंबा अंबिका लेणी कोरण्यासाठी गुजरात येथील लाकडाच्या व्यापाऱ्यांनी तसेच भुत लेणी व शिवनेरी, लेण्याद्रीच्या काही लेणी कोरण्यासाठी ग्रीक लोकांनी दान दिल्याचे उल्लेख शिलालेखात आढळतात.त्याचप्रमाणे औषधी वनस्पती,जांभूळ,करंज इ.साठी तसेंच भिक्खू संघाला जमीन दान दिल्याचे उल्लेख येथील शिलालेखमध्ये आढळुन येतात. भूतलेणी येथे असलेल्या स्तूपाच्या प्रवेशद्वारावरील नागराज आणि गरुडराज यांच्या कोरलेली प्रतिमा,वैरभाव विसरून बुद्धाचा शांती आणि धम्माचा मार्ग अवलंबलेला संदेश यामधून मिळतो.
जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला असला तरी लेण्यांच्या ,परिसराच्या विकासासाठी पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विभाग यांची उदासीनता दिसून येते.
देश विदेशातील अनेक पर्यटक जुन्नर परिसरातील लेणींचा अभ्यास करण्यासाठी येत असतात.जुन्नर मध्ये प्रवेश करताना या लेण्यांची माहिती असलेले कोणतेही दिशा दर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत,लेण्यांकडे जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत,जंगलातुन लेणीकडे जाण्यासाठी पाऊलवाटेने मार्ग काढत जावे लागते, लेण्याचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या देशविदेशातील अनेक पर्यटकांवर मधमाशांचे हल्ले झाले असल्याने आपलीच प्रतिमा परदेशात मलीन होत आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने या ठिकाणी सुचनाफलक लावणे गरजेचे आहे.
या लेण्या कोरण्यासाठी राजे,व्यापारी,शेतकरी यांनी दान दिल्याचे उल्लेख येथील शिलालेखातुन मिळतात.या लेण्यांच्या चैत्यगृह, विहार ,पाणपोढी इत्यादि बाबतची ऐतिहासिक माहिती दर्शवणारे फलक लावणे गरजेचे आहे.
हळू हळू नागरिकांमध्ये जागृती होत असली तरी जुन्नर तालुक्यात राहणाऱ्या अनेकजण या लेण्यांच्या इतिहासाबाबत अनभिज्ञ आहेत. पुरातत्व विभागाकडुन या लेण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे का?असा सवाल लेणी अभ्यासक आणि पर्यटक व्यक्त करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी वर सर्वाधिक लेणी आढळतात.
परन्तु दुर्दैवाने या लेण्या मात्र अत्यंत दुर्लक्षित आहेत.
चार ही बाजुंनी जवळपास ६० ते ६५ बुद्ध लेणी आहेत. तसेच दोन हजार वर्षां पुर्वी केलेले रंगकाम येथील काही लेण्यां मध्ये पहायला मिळते,दुर्दैवाने हे रंगकाम मात्र अंतिम घटका मोजत आहे. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा वारसा जतन करण्याची गरज आहे.या लेणींची स्थापत्य कला देखील अतिशय उत्तम आहे.
किल्ले शिवनेरी आणि परिसर विकासासाठी कोट्यवधींचा निधी येत असताना या लेण्यांकडे शासनाने का दुर्लक्ष केले हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. लेण्या पाहण्यासाठी जाताना दिशा दर्शक फलकांचा अभाव असुन लेणी वर जाण्यासाठी योग्य मार्ग देखील नाहीत.तेथे निदान तेथे पायरी मार्ग करणे गरजेचे आहे जेणेकरून सर्वानाच लेणी पाहणे सोयीस्कर होईल.पडझड झालेल्या लेण्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने देखील लेणी अभ्यासक नाराजी व्यक्त करत आहेत.
जागतिक पर्यटक जुन्नर मध्ये आणण्यासाठी या लेण्यांचा विकास करणे आवश्यक.
साधारणतः १० वर्षांपूर्वी थायलंड देशांमधून सुमारे तीनशे परदेशी नागरिक जुन्नरला आले होते.कल्याण नाणेघाट या प्राचीन मार्गाने पायी प्रवास करत ते जुन्नर मध्ये आले होते,त्यामध्ये बौद्ध भिक्खू,उपासक यांचा समावेश होता.त्यांनी जुन्नर परीसरात काही लेण्यांना भेट दिली होती.शासनाने अजिंठा लेणीच्या धर्तीवर जुन्नरमधील लेण्यांचा विकास केल्यास जगातील बौद्ध राष्ट्रांचे जुन्नर मध्ये पर्यटन वाढेल.
बौध्द राष्ट्रांची आर्थिक मदत होईल. पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरच्या अर्थकारणात बदल होण्यास मदत होईल.
बौध्द कला संस्कृती अडीज हजार वर्षांपासून भारतीय सांस्कृतिक वर्षाचे प्रतिनिधित्व असून बौध्द लेणी स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, मुर्तीकलेचा भारताच्या संस्कृतीवर वेगळा ठसा आहे.
ही कला भारताची अनुपम कला व समृध्द बौध्द संस्कृतीचे दर्शन घडविते. काळाच्या ओघात या कला-संस्कृतीचे विदृपीकरण, विकृतीकरण झाले आहे. लेण्यांच्या स्वरुपातील सांस्कृतिक वारसा केवळ जतन न करता त्याचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे तरच पुढील पीढिला हा वारसा पाहायला मिळेल.
भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा असलेल्या बुद्धलेणींचे जतन आणि संवर्धन करणे शासनासोबतच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून या वास्तूंचे पावित्र्य टिकवण्यासोबतच त्याचे विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता घेणे देखील गरजेचे आहे.
विकासकामांबरोबरच बौध्द लेणी स्थापत्याचे संरक्षण, संवर्धन केले पाहिजे कारण बौध्द कला-संस्कृती हीच भारताचा सांस्कृतीक वारसा आहे. कारण या लेणींद्वारे प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते.
जुन्नर तालुक्यात सर्वाधिक लेण्या असून या ऐतिहासिक वारशाचे सरकारने जतन करावे. या लेण्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.पुरातत्व विभागाने या लेण्यांची देखभाल,स्वच्छता तसेच संवर्धन करणे आणि पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. – अतुल बेनके (आमदार)