मंचर -जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये पिकणाऱ्या हापूस आंब्याला सन्मान देण्यासाठी “शिवनेरी हापूस’ म्हणून मानांकन देण्यासाठी मंत्री वळसे पाटील यांनी केलेल्या सूचनेची कार्यवाही करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक अभिमन्यू काळे यांच्यासह इतर आंबा उत्पादकांनी उपमुख्यमंत्री पवार हे जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त आंबा बागा पहाण्यासाठी आले असता ही मागणी केली होती.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत उपमुख्यमंत्री पवार आणि कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. देवगड, रत्नागिरीकडील आंबा उत्पादक घाटावरच्या आंब्याला हापूस मानत नाहीत.
मात्र घाटावरचा आंबा सुद्धा देवगड, रत्नागिरीच्या तोडीस तोड आहे. कोकणातील हवामान व घाटावरचे हवामानामुळे दरवर्षी कोकणातील आंबा संपल्यावर घाटावरचा आंबा सुरू होतो. त्यामुळे तो दुर्लक्षीत आहे. जर या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन मिळाल्यास बाजारात त्याचे वेगळे स्थान तयार होईल. त्यातून मागणी वाढल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. बागा वाढतील. यासाठी जुन्नर, आंबेगावातील आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन करुन घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश पवार यांनी दिले आहेत.
“आंब्याच्या विम्याची मुदत वाढवा’
कोकणातील आंब्याच्या विम्याची मुदत 3 जून आहे तर घाटावरचा आंबा 3 जूनच्या पुढे सुरू होतो. जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसामुळे आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याचे मोठे नुकसान होते. यासाठी आंब्याच्या विम्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवावी, अशी सूचना मंत्री वळसे पाटील यांनी केली.